मंत्री आशिष शेलार (फोटो- सोशल मिडिया)
गणेशोत्सवाला महाराष्ट्र राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्यानंतर पुण्यात प्रथमच राज्य सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे १६ ते १८ सप्टेंबरदरम्यान शनिवारवाड्यावर हा महोत्सव पार पडला. आशिष शेलार यांनी महोत्सवाला भेट देऊन कलाकार आणि पुणेकरांना शुभेच्छा दिल्या.
आशिष शेलार म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार सर्वांनी एकत्र येऊन जनतेचा विचार करावा. नियमांच्या चौकटीत राहून गणेशोत्सव साजरा करत समाजहिताचे काम करावे. कोणालाही त्रास होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्याबाबत शेलार म्हणाले की, गणेशोत्सवातील सहभाग, सामाजिक आणि राष्ट्रप्रबोधन, सांस्कृतिक कार्यक्रम, भाविकांची गर्दी आणि विविध देखावे यामुळे या उत्सवाची व्याप्ती मोठी आहे.
गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सवाची परंपरा आणि सांस्कृतिक वैशिष्ट्ये जगभर पोहोचविण्यासाठी ‘बाप्पा डॉट ओआरजी’ हे व्यासपीठ सुरू करण्यात आले आहे. पुणेकरांनी या संकेतस्थळावर घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सवातील छायाचित्रे, सांस्कृतिक कार्यक्रम आणि परंपरांच्या कथा शेअर कराव्यात, असे आवाहन शेलार यांनी केले. या माध्यमातून गणेशोत्सवाची माहिती जगभर पोहोचवून त्याला वैश्विक सांस्कृतिक वारसा म्हणून मान्यता मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
श्रीकृष्ण मंडळाने उभारला ‘चॉकलेटचा बंगला’
असावा सुंदर चॉकलेटचा बंगला… हे लोकप्रिय बालगीत ऐकताना लहान मुलांच्या कल्पनेत उभा राहणारा चॉकलेटचा बंगला यंदाच्या गणेशोत्सवात प्रत्यक्षात अनुभवायला मिळत आहे. गणेशोत्सवामध्ये केवळ धार्मिक विषयांवरील किंवा भव्यदिव्य देखावेच नव्हे, तर लहान मुलांचे बालविश्व आणि आवडीनिवडी केंद्रस्थानी ठेवून साकारलेले देखावे पुणेकरांचे विशेष लक्ष वेधून घेत आहेत.






