सौजन्य - नवराष्ट्र टीम
पिंपरी : लोहगडावर ट्रेकिंगला गेलेल्या केतन अग्रवालचा अपघाती मृत्यू नसून, तो कट रचून केलेला खून असल्याचे पोलिसांनी उघड केले आहे. त्याची होणारी पत्नी सिया आणि तिच्या प्रियकर चेतन चौधरीनेच केतनला दरीत ढकलून ठार केले. लग्नाला नकार असल्याने हे हत्याकांड घडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेने पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे. यावरुन आता नागरिक आक्रमक झाले आहेत. केतन अग्रवाल याच्या मृत्यू प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी आणि अग्रवाल कुटुंबीयांना न्याय मिळावा, या मागणीसाठी शनिवारी लोढा बेल्मोंड सोसायटी परिसरात नागरिकांनी मोठा कॅण्डल मार्च काढला. या मार्चमध्ये सोसायटीतील रहिवाशांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातात मेणबत्त्या आणि न्यायाची मागणी करणारे फलक घेऊन नागरिकांनी शांततेत हा मोर्चा काढत केतन अग्रवाल याला श्रद्धांजली अर्पण केली.
केतन अग्रवाल याचा लोहगड किल्ला परिसरात मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाची मोठी चर्चा झाली होती. या प्रकरणात त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्यावर खुनाचा आरोप असून पुणे ग्रामीण पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती.
हे सुद्धा वाचा : ऑपरेशन उबाठा बुडवाचे सूत्रधार संजय राऊतच; खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांचा घणाघात
कॅण्डल मार्चदरम्यान नागरिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी केली. तसेच अग्रवाल कुटुंबीयांना न्याय मिळावा आणि अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी, असेही नागरिकांनी सांगितले. यावेळी उपस्थित नागरिकांनी केतन अग्रवाल याच्या स्मृतीप्रित्यर्थ दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. परिसरात शांतता आणि शिस्तीच्या वातावरणात हा कॅण्डल मार्च पार पडला. दरम्यान, या प्रकरणातील तपास सुरू असून पोलिसांकडून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. नागरिकांनी या प्रकरणात निष्पक्ष आणि जलद तपास करून दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.






