
कांद्याबाबत केंद्र, राज्य सरकार सकारात्मक; वळसे पाटलांनी आंदोलकांना केले 'हे' महत्वाचे आवाहन
रांजणी : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर बनला असून, त्यांना योग्य बाजारभाव मिळत नसल्याने अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेत ज्येष्ठ नेते आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी आंदोलक आणि शेतकऱ्यांना सकारात्मक चर्चेसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असून, मागण्यांबाबत चर्चा करून योग्य सुधारणा करण्याची पूर्ण तयारी असल्याचे वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले.
आंदोलनकर्त्यांनी आंदोलन स्थगित करून चर्चेसाठी यावे, असे आवाहन करताना त्यांनी, “आंदोलक माझ्याकडे आले तर त्यांचे आदरातिथ्य करायला मला आनंदच होईल. त्यांनी आंदोलनस्थळी बोलावले तरी कोणताही पूर्वग्रह न ठेवता त्यांच्या भावना ऐकण्यासाठी मी तेथे जाण्यास तयार आहे,” असे सांगितले.
कांदा उत्पादक आणि साखर उद्योगाच्या विविध प्रश्नांबाबत केंद्र पातळीवर सकारात्मक हालचाली सुरू असल्याची माहिती देताना वळसे-पाटील म्हणाले की, गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबल, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, पणन मंत्री जयकुमार रावल, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यासह केंद्रीय कृषिमंत्री शिवराज केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी उपस्थित होते. बैठकीत राज्यातील कांदा उत्पादकांची सद्यस्थिती आणि त्यांच्यासमोरील अडचणी केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. यावेळी अमित शाह यांनी विषय गांभीर्याने घेत पुढील दहा दिवसांत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याचे वळसे-पाटील यांनी सांगितले. या संदर्भात आपण सातत्याने केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यालयाशी संपर्कात असून पाठपुरावा करत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
शरद पवारांची भेट घेणार
कांदा उत्पादकांच्या विविध मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी आपण लवकरच ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती वळसे पाटील यांनी दिली. दिल्लीतील बैठकीची सविस्तर माहिती त्यांना देऊन केंद्र सरकारकडे कांदा उत्पादकांना अधिकाधिक दिलासा मिळावा यासाठी पाठपुरावा करण्याची विनंती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हवामान आणि अर्थव्यवस्थेबाबतही चिंता व्यक्त
हवामान खात्याच्या अंदाजाचा उल्लेख करताना वळसे-पाटील यांनी आगामी काळातील आव्हानांकडे लक्ष वेधले. ‘एल निनो’ च्या प्रभावामुळे यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता असून, दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे ऊस, कांदा आणि इतर नगदी पिकांचे नियोजन करताना शेतकऱ्यांनी हवामानातील बदलांचा गांभीर्याने विचार करावा, असा सल्ला त्यांनी दिला. आखाती देशांमधील संघर्ष आणि जागतिक आर्थिक परिस्थितीमुळे महागाई व आर्थिक मंदीचे सावट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करताना त्यांनी कृषी क्षेत्र देशाच्या अर्थव्यवस्थेला स्थैर्य देऊ शकते, असा विश्वास व्यक्त केला.
हे सुद्धा वाचा : एक चूक अन् अनेकांचे आयुष्य पणाला; पिंपळवंडी चौकातील घटना सीसीटीव्हीत कैद
संवादाचा मार्ग स्वीकारल्यास तोडगा काढणे शक्य
“कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत केंद्र आणि राज्य सरकार सकारात्मक आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. आंदोलनकर्त्यांनी संवादाचा मार्ग स्वीकारल्यास योग्य तो तोडगा काढणे शक्य होईल,” असे आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटले आहे.