
मीना नदीवरील बंधारे पडले कोरडे; आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांची चिंता वाढली
रांजणी : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात मीना नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातील पाणीसाठा संपल्याने शेतीपिकांना ताण बसू लागला आहे. परिणामी, या भागातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. रांजणी, वळती, नागापूर, शिंगवे या गावांना मीना नदीचे पात्र वरदान ठरले असून, येथे सात कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. यंदा या परिसरात अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे मीना नदीपात्र कोरडेठाक पडले आहे.
या भागातील बहुतांश शेतकरी मिना नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. या भागातील मीना नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांमधील पाणीसाठा संपुष्टात आल्याने शेतीपिकांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या भागातील विहीरींनीही तळ गाठला असून, अनेक बोअरवेलही पाण्याअभावी बंद पडले आहेत. केटी बंधाऱ्यातील पाणीसाठा संपुष्टात आल्याने अनेक शेतकऱ्यांचे नदीवरील वीजपंप उघड्यावर पडले आहेत. शेतकऱ्यांनी अंतिम टप्प्यात आलेल्या पिकांना पाणी द्यायचे कुठून ? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
पिकांना पाण्याची नितांत गरज
परिसरातील अनेक शेतकऱ्यांचा कांदा पिक अंतिम टप्प्यात आले असून, काही शेतकऱ्यांचे उसाचे पिक तसेच मोठ्या प्रमाणावर गुरांचा चारा पिकेही आहेत. सध्या या पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. आताच पाणीटंचाई निर्माण झाल्याने या पुढील काळात शेतीपिकांना पाणी द्यायचे कुठून, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. या भागातील शेतकरी नदिच्या पाण्यावर अवलंबुन असुू सध्या पाण्याअभावी शेती पिके सुकून चालली आहेत, तरी जलसिंचन विभागाने लवकरात लवकर मीना नदीला पाणी सोडण्याची कार्यवाही करावी व तालुक्याच्या पुर्व भागातील शेतकऱ्यांची पाण्याची गंभीर समस्या सोडवावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे .
तालुक्याच्या पुर्व भागात मीना नदीवरील नागापुर-वळती केटी बंधाऱ्यावरीली पाणी गळतीमुळे बंधारे लवकर कोरडे पडले. अंतिम टप्प्यात आलेले कांदा पिक, जनावरांची चारा पिके धोक्यात आली आहेत. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजन व केटी बंधारे यातील मोठ्या प्रमाणात झालेल्या पाणी गळतीमुळे ही वेळ शेतकऱ्यांवर ओढावली आहे. त्यामुळे संबंधीत विभागाने दखल घेऊन त्वरीत पाणी गळतीवर उपाय करून नदी पात्रात त्वरीत पाणी सोडण्यात यावे. – तबाजी लोखंडे, शेतकरी, वळती
कोल्हापूरकरांना अवकाळीचा दिलासा
गेल्या आठवडाभरापासून उन्हाच्या चटक्याने आणि वाढत्या तापमानाने हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना शनिवारी पहिल्याच अवकाळी पावसाने थोडासा का होईना दिलासा दिला. शहरात तुरळक प्रमाणात पाऊस पडला शहराच्या आसपास च्या भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. दुपारी तीनच्या सुमारास अचानक आलेल्या पावसामुळे शहरात सर्वत्र गारवा निर्माण झाला होता. उकाड्यापासून नागरिकांची तात्पुरती तरी सुटका झाली अशी भावना सर्वत्र होती. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाने उच्चांक गाठला होता. दुपारच्या वेळी रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळत होता. मात्र, शनिवारी दुपारी अचानक ढगांची दाटी झाली आणि पावसाला सुरुवात झाली. या अनपेक्षित पावसामुळे कोल्हापूरकरांना एक प्रकारे सुखद धक्काच मिळाला.
हे सुद्धा वाचा : यंदा तिखट-मसाल्याच्या दरामुळे डोळ्यांत येणार पाणी; अवकाळीचा बसतोय मोठा फटका