
आळेफाटा परिसरात कांदा काढणीची लगबग; दर कोसळल्यामुळे शेतकरी संकटात
आळेफाटा : सध्या कांद्याला समाधानकारक भाव मिळत नसतानाही जुन्नर तालुक्यातील शेतकरी मात्र खचलेला दिसत नाही. “शेती थांबत नाही” हे वास्तव पुन्हा एकदा समोर आले असून आळेफाटा परिसरातील शेतांमध्ये सध्या कांदा काढणीची लगबग सुरू आहे. आळे, संतवाडी, कोळवाडी, लवनवाडी, राजुरी, तांबेवाडी, बोरी बुद्रुक, पिंपळवंडी, काळवाडी, उंब्रज नंबर एक व नंबर दोन परिसरातील शेतांमध्ये सकाळपासून मजूरांच्या सहाय्याने कांदा काढणीचे काम सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यंदा उत्पादन चांगले झाले असले तरी बाजारभावाने शेतकऱ्यांची मोठी निराशा केली आहे.
खर्चाच्या तुलनेत मिळणारा दर अत्यंत कमी असल्याने अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत, असे असतानाही पिक शेतात जास्त काळ ठेवणे धोकादायक ठरू शकते. उन्हामुळे कांद्याचे नुकसान होऊ नये, तसेच पुढील प्रक्रिया वेळेत पूर्ण व्हावी यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणावर काढणीकडे वळले आहेत.
तापमानात मोठी वाढ
सध्या तापमानात मोठी वाढ झाली असून, दुपारच्या वेळेत उष्णतेचा तडाखा अधिक जाणवत आहे. त्यामुळे कांदा काढणी करणारे मजूर आणि शेतकरी दोघेही स्वतःची विशेष काळजी घेताना दिसत आहेत. डोक्यावर टॉवेल, टोपी, चेहऱ्यावर कापड, सोबत पाण्याच्या बाटल्या आणि मधूनमधून सावलीत विश्रांती घेत काम सुरू असल्याचे चित्र ग्रामीण भागात सर्वत्र दिसून येत आहे. काही ठिकाणी महिला वर्गही मोठ्या प्रमाणावर कांदा वेचणी व गोणीत भरण्याच्या कामात व्यस्त असल्याचे दिसत आहे. कांदा काढणीनंतर तो शेतात सुकवणे, त्याची प्रतवारी करणे आणि बाजारपेठेत पाठविण्याची तयारी सुरू झाली आहे. मात्र कमी बाजारभावामुळे वाहतूक, मजुरी आणि इतर खर्च वजा जाता हातात फारसे काही उरत नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत.
भाव नसला तरी पिक काढावेच लागते
“भाव नसला तरी पिक काढावेच लागते, कारण शेती थांबवून चालत नाही,” अशी भावना चंद्रकांत घोडके, राजेश कणसे, वसंत कदम, शिवाजी डुंबरे या शेतकऱ्यांनी व्यक्त केली. दरम्यान, सततच्या बदलत्या हवामानामुळे आणि बाजारातील अनिश्चिततेमुळे शेतकरी चिंतेत असला तरी मेहनतीच्या जोरावर तो पुन्हा उभा राहत असल्याचे चित्र आळेफाटा परिसरात पाहायला मिळत आहे. उन्हाच्या कडाक्यातही शेतात घाम गाळणारा बळीराजा आजही आशेवर शेती करत असल्याची भावना या कांदा काढणीच्या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झाली आहे.