
दप्तराच्या ओझ्याखाली कोमेजतेय बालपण; विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर!
राजेगाव : शाळेत जाणाऱ्या चिमुकल्यांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे दिवसेंदिवस वाढतच चालले असून, हे ओझे आता त्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरू लागले आहे. विशेषतः पहिली-दुसरीच्या विद्यार्थ्यांना आपले दप्तर पेलणेही कठीण झाले असून, शासनाने यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी पालकांमधून जोर धरत आहे. राजेगाव परिसरात चित्र पाहायला मिळते की, शाळेची घंटा वाजली की लहान मुले पाठीवर मोठमोठी दप्तरे घेऊन वाकून चालताना दिसतात. अनेकदा दप्तराचे वजन इतके असते की, पहिलीतील चिमुकल्यांना घरून शाळेपर्यंत नीट चालताही येत नाही. शाळेत नेल्या जाणाऱ्या वह्या, पुस्तके, डबा आणि पाण्याची बाटली या सर्वांमुळे दप्तराचे वजन मुलांच्या वजनाच्या तुलनेत कितीतरी पटीने वाढले आहे.
आरोग्यावर होतात गंभीर परिणाम
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, कोवळ्या वयात पाठीवर सतत जास्त वजन घेतल्यामुळे मुलांच्या मणक्यावर आणि खांद्यावर विपरीत परिणाम होत आहेत. यामुळे मुलांना पाठदुखी आणि मानदुखीचा त्रास सुरू होणे. शरीराचा सांगाडा चुकीच्या पद्धतीने वाकणे, लवकर थकवा येणे आणि अभ्यासातील एकाग्रता कमी होणे, असे परिणाम होत असतात.
शाळेत जाताना लागते धाप
शाळेत जाताना त्याला धाप लागते. काही पालकांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, “आमचा मुलगा जेमतेम सात वर्षांचा आहे, पण त्याच्या दप्तराचे वजन पाहिले की भीती वाटते. शाळेत जाताना त्याला धाप लागते. जर आताच ही अवस्था असेल, तर भविष्यात त्याच्या शारीरिक वाढीवर काय परिणाम होईल? असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे.
शासनाने यापूर्वी दप्तराचे वजन कमी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. ‘एकात्मिक पाठ्यपुस्तके’ किंवा ‘दप्तरमुक्त शाळा’ असे उपक्रम कागदावर राबवले जातात. मात्र, प्रत्यक्षात खासगी शाळांमधील वाढती वह्यांची संख्या आणि अवांतर पुस्तकांमुळे ही नियमावली धाब्यावर बसवली जात असल्याचे चित्र आहे.
हे सुद्धा वाचा : पीएमपीच्या ताफ्यात 45 ई-बसेस दाखल; उर्वरित 110 बसेसची पुणेकरांना प्रतिक्षा कायम…
‘एकच वही’ ही संकल्पना राबवावी
शाळेतच कपाटांची सोय करून गरजेची पुस्तके तिथेच ठेवण्यात यावीत. वह्यांची संख्या मर्यादित करून ‘एकच वही’ ही संकल्पना राबवावी. शाळांनी वेळापत्रकाची काटेकोर अंमलबजावणी करावी. जेणेकरून नको असलेली पुस्तके आणावी लागणार नाहीत. दप्तर म्हणजे केवळ पुस्तकांचे ओझे नसून ते ज्ञानाचे साधन असावे. मात्र, सध्या हे ओझे मुलांच्या आनंदी बालपणाला चिरडत आहे. शिक्षण विभागाने केवळ नियम न काढता त्याची प्रभावी अंमलबजावणी होते की नाही, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा, उद्याची पिढी शारीरिकदृष्ट्या कमकुवत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.