संग्रहित फोटो
बारामती/अमोल तोरणे : कॅप्टन अशोक खरात याच्या अटकेनंतर राज्यात उघड होत असलेल्या धक्कादायक प्रकारांमुळे भोंदू बाबांच्या वाढत्या सुळसुळाटाचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विविध तपास यंत्रणा, सामाजिक संघटना आणि स्थानिक प्रशासनाच्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये ‘किमती खडे’, ‘ग्रहबाधा निवारण’ आणि ‘भविष्य बदलणारे उपाय’ यांच्या नावाखाली नागरिकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक होत आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “अनेक भोंदू स्वतःला आध्यात्मिक मार्गदर्शक म्हणून सादर करतात. ते आधी लोकांचा विश्वास जिंकतात आणि नंतर हळूहळू त्यांच्याकडून मोठ्या रकमा उकळतात. काही प्रकरणांमध्ये महिलांचे शोषणही झाल्याचे समोर आले आहे.”
सामाजिक कार्यकर्त्यांनीही याबाबत चिंता व्यक्त केली आहे. एका अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्त्याने सांगितले की, “बेरोजगारी, आजारपण आणि कौटुंबिक समस्या यामुळे लोक मानसिकदृष्ट्या कमकुवत होतात. याच परिस्थितीचा गैरफायदा घेत भोंदू बाबा त्यांना जाळ्यात ओढतात. हे केवळ आर्थिक नाही, तर मानसिक गुलामी निर्माण करणारे जाळे आहे.” मानसशास्त्रज्ञांच्या मते, संकटात सापडलेल्या व्यक्तींना तात्काळ उपाय हवा असतो. “लोकांना वाटते की एखादा चमत्कारिक उपाय त्यांच्या समस्या सोडवेल. हीच मानसिकता भोंदूगिरीला खतपाणी घालते,” असे एका तज्ज्ञाने स्पष्ट केले.
कॅप्टन अशोक खरात प्रकरणातही याच पद्धतीने विश्वास संपादन करून विशेषतः महिलांना लक्ष्य करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणामुळे समाजात संताप व्यक्त होत असून कठोर कायदेशीर कारवाईची मागणी जोर धरत आहे. दरम्यान महाराष्ट्रात यापूर्वी अनेक भोंदू बाबांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये महिलांचे देखील शोषण काही भोंदू बाबांनी केल्याचे निष्पन्न झाले होते, बारामती परिसरातील असाच एक भोंदू बाबा देखील मोठा चर्चेत आला होता. सुरुवातीला अटकेत असलेला हा बाबा पुन्हा आपले बस्तान बसवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. दरम्यान काही परप्रांतीय भोंदू बाबांच्या मायाजालात असलेले अनेक दिग्गज नेते, आपले ध्येय किंवा स्वप्न पूर्ण करण्यासाठी अघोरी उपायाकडे देखील वळाल्याचे चित्र महाराष्ट्रात आहे. भोंदूगिरीच्या माध्यमातून कोट्यावधीची माया जमवण्याचे भोंदू बाबांचे पेव महाराष्ट्रासह इतर राज्यात देखील मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.
राज्य शासनानेही अशा प्रकारांवर नियंत्रण आणण्यासाठी मोहीम राबवण्याचे संकेत दिले आहेत. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, “कोणत्याही चमत्कारिक दाव्यांवर विश्वास ठेवू नका. संशयास्पद व्यक्ती किंवा प्रकार दिसल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्या.” तज्ज्ञांच्या मते, अंधश्रद्धेविरोधात केवळ कायदे पुरेसे नाहीत, तर जनजागृतीही तितकीच आवश्यक आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि शिक्षणाच्या माध्यमातूनच या समस्येवर दीर्घकालीन उपाय शक्य असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.






