
मोठ्या प्रकल्पांपेक्षा मूलभूत सुविधांना प्राधान्य द्या; खासदार श्रीरंग बारणे यांचे महापालिका प्रशासनाला निर्देश
पिंपरी : पिंपरी- चिंचवड “शहरात किती मोठे प्रकल्प राबविले यापेक्षा पाणी, स्वच्छता आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधा नागरिकांना किती सक्षमपणे मिळतात, हे अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रशासनाने भपकेबाज प्रकल्पांऐवजी पिण्याचे शुद्ध पाणी आणि आरोग्य सुविधांवर भर द्यावा,” असे स्पष्ट निर्देश शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी सोमवारी महापालिका प्रशासनाला दिले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत खासदार बारणे यांनी आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्यासोबत आढावा बैठक घेतली.
या बैठकीला अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, तृप्ती सांडभोर, मुख्य लेखाधिकारी प्रवीण जैन, उपायुक्त ममता शिंदे, सहशहर अभियंता बापू गायकवाड, सुनील भागवानी, वायसीएमचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, शिवसेना उपनेत्या सुलभा उबाळे, गटनेते विश्वजित बारणे, निलेश तरस, निलेश बारणे, ऐश्वर्या तरस आणि बापू कातळे उपस्थित होते.
अशुद्ध पाणीपुरवठ्याबाबत चिंता; पर्यायी स्त्रोतांचा विचार करा
खासदार बारणे यांनी शहरातील पाणीपुरवठ्याच्या गंभीर स्थितीवर बोट ठेवले. ते म्हणाले की, “रावेत आणि निघोजे बंधाऱ्यातून उचलले जाणारे पाणी अत्यंत अशुद्ध आहे. देहूरोड आणि किवळे भागातील नाल्यांचे पाणी तसेच काही सोसायट्यांचे सांडपाणी थेट नदीपात्रात मिसळत आहे. भविष्यात नागरिकांना दूषित पाणी मिळण्याची भीती असल्याने प्रशासनाने ‘शिवणे’ बंधाऱ्यातून पाणी उचलण्याबाबत तातडीने चाचपणी करावी.”
तसेच, शहरातील १८५ किलोमीटरची पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईनच्या जवळून किंवा खालून गेली आहे. अनेक ठिकाणी चेंबर्सची दुरवस्था झाल्याने हे पाणी प्रदूषित होत आहे. ही पाईपलाईन तातडीने बदलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. “शहरातील टँकर लॉबी बंद झाली पाहिजे आणि नागरिकांना पुरेसे व स्वच्छ पाणी मिळालेच पाहिजे,” असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
मोकाट श्वानांसाठी ‘जीपीएस’चा वापर करा
शहरात वाढत्या मोकाट श्वानांच्या उपद्रवावर उपाययोजना म्हणून खासदार बारणे यांनी नाविन्यपूर्ण सूचना केली. मोकाट आणि पाळीव श्वानांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांना ‘जीपीएस’ (GPS) सिस्टीम बसवता येईल का, याचा अभ्यास करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यामुळे कोणत्या श्वानाने चावा घेतला किंवा त्यांचा वावर कुठे आहे, याची अचूक माहिती मिळू शकेल. तसेच श्वानांसाठी विशेष संगोपन केंद्र उभारून रेबीज प्रतिबंधक लसीकरणावर भर देण्यास त्यांनी सांगितले.
हे सुद्धा वाचा : अखेर ठरलं! पिंपरीतील डेअरी फार्म पूल कधी खुला होणार? महत्त्वाची माहिती समोर
पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण करा
सांडपाणी वाहिन्यांची वेळेवर साफसफाई होत नसल्याने पावसाळ्यात पाणी साचण्याच्या तक्रारी वाढतात. हे टाळण्यासाठी पावसाळ्यापूर्वी सर्व सांडपाणी आणि पावसाळी वाहिन्यांची स्वच्छता पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी संबंधित विभागाला दिले.