
पेपरफुटी वादावर MPSC अध्यक्ष भीमनवारांचं मोठं स्पष्टीकरण
MPSC Paper Leal Controversy : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमधील कथित पेपरफुटी आणि कारभारावरून राज्यभरात संताप व्यक्त होत असताना आता आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपल्यावर सातत्याने वैयक्तिक आणि प्रतिमा मलिन करणारे राजकीय आरोप होत असल्याने व्यथित झाल्याचं सांगत, आपल्या विरोधात एकही ठोस पुरावा सादर झाल्यास पदावर राहणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
औषध निरीक्षक गट-ब परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याच्या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना ही घटना आपण अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारण्यापूर्वीची असल्याचं भीमनवार यांनी स्पष्ट केलं. तक्रार मिळाल्यानंतर आयोगाने पोलिसांत तक्रार दाखल केली असून प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.
पेपरफुटीच्या घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी आयोगाने उच्चस्तरीय समिती स्थापन केल्याची माहितीही त्यांनी दिली. राज्य सरकारनेदेखील यासाठी उच्चाधिकार समिती गठीत केली असून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी चर्चा सुरू असल्याचं त्यांनी नमूद केलं.
Pune MPSC Student Protest : MPSC पेपरफुटीवर काँग्रेस आक्रमक; मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
आपल्या कार्यकाळातील कामगिरीचा उल्लेख करताना भीमनवार यांनी स्पर्धा परीक्षांच्या 8 आणि सरळसेवा भरतीच्या 76 चाळणी परीक्षा, अशा एकूण 84 परीक्षा पार पडल्याचं सांगितलं. निकाल प्रक्रियेतही सुधारणा झाल्याचा दावा करत आता 18 ते 21 दिवसांत निकाल जाहीर करणं शक्य झालं आहे, असं त्यांनी म्हटलं. भविष्यात सर्व परीक्षांचे निकाल एका महिन्यात जाहीर करण्याचं नियोजन असल्याचंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, एमपीएससीच्या कारभाराविरोधात पुण्यात विद्यार्थ्यांनी मोठा मोर्चा काढला. ओंकारेश्वर मंदिरापासून सुरू झालेला आक्रोश मोर्चा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. औषध निरीक्षक परीक्षा रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये नाराजी असल्याचं चित्र पाहायला मिळालं. आंदोलक विद्यार्थ्यांनी आयोगाचे अध्यक्ष आणि सचिव यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.
Pune MPSC Student Protest : ‘जनाची नाही, मनाची तरी असेल तर ..,’रोहिणी खडसेंचा सरकारवर हल्लाबोल
या आंदोलनाला शरद पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने पाठिंबा दिला. खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार आणि आमदार विश्वजीत कदम हे आंदोलनात सहभागी झाले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवताना रोहित पवार यांनी, परीक्षा प्रक्रियेतील गैरप्रकारांबाबत प्रश्न विचारण्यात राजकारण काय, असा सवाल उपस्थित केला.