
मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर सहा नवीन बोगदे
पुणेकरांचा प्रवास लवकरच अधिक वेगवान
या प्रकल्पासाठी सुमारे १०४ हेक्टर जमिनीची गरज
पुणे: मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग (National Highway) यावर सहा नवीन बोगदे उभारण्याची योजना पुढे आली आहे. या प्रकल्पासाठी सुमारे १०४ हेक्टर जमिनीची गरज असून त्याबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ ( एमएसआरडीसी) यांनी राज्य सरकारकडे सादर केला आहे. या नव्या बोगद्यांमुळे द्रुतगती मार्गावर वाहतुकीची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार असून दररोज सुमारे दीड लाख वाहने धावू शकतील, त्यामुळे प्रवासाचा वेळही कमी होणार आहे.
पुण्यातील वाहतूक कोंडी ही कायमची समस्या बनली आहे. विशेषतः पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर वाढत चाललेली वाहनसंख्या आणि त्यातून निर्माण होणारी कोंडी लक्षात घेता एमएसआरडीसी प्रशासनाने या मार्गावरील मार्गिका वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार तयार केलेला अहवाल प्रशासकीय मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात आला असून लवकरच त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मार्गिका वाढवताना सहा वेगवेगळ्या ठिकाणी नवीन बोगदे बांधण्याचा प्रस्ताव आहे. यामध्ये खंडाळा येथे एक, कामशेत येथे दोन, भाटण येथे एक,आडोशी येथे एक आणि माडप येथे एक अशा एकूण सहा बोगद्यांचा समावेश आहे. या कामासाठी सुमारे १०४ हेक्टर जमीन लागणार असून प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
Pune-Mumbai महामार्गवारील वाहतूक कोंडीवर पर्याय निघणार? ‘या’ मार्गाचा प्रस्ताव चर्चेत
दरम्यान,भविष्यात पुणे शहरात विविध रस्ते प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता असल्याने पुण्यातून बाहेर पडणाऱ्या वाहनांची संख्या आणखी वाढणार आहे. ही वाढ लक्षात घेऊन पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावरील मार्गिकांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. सध्या या मार्गावर सहा मार्गिका आहेत; त्यामध्ये आणखी चार मार्गिका वाढवण्याचा विचार सुरू आहे. या मार्गावर दररोज सुमारे ७० ते ८० हजार वाहने धावतात, मात्र मार्गिका वाढल्यानंतर ही संख्या वाढून दररोज अंदाजे दीड लाख वाहनांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
Mumbai-Pune Express वे वर 32 तासांचा ट्रॅफिक जाम; कोंडी दूर करण्यासाठी पोलिसांची तत्परता
मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाचे दहा लेन करणे ही काळाची गरज बनली आहे. कारण आठवड्याच्या शेवटी, सार्वजनिक सुट्ट्या तसेच गणेशोत्सव, दिवाळी, नवरात्र, दसरा यांसारख्या सणांच्या काळात या मार्गावर प्रचंड वाहतूक होते. अशा वेळी दररोज वाहनांची संख्या १ लाखांहून अधिक होते.त्यामुळे मार्गाची क्षमता वाढवणे म्हणजेच अतिरिक्त लेनची भर घालणे अत्यंत आवश्यक आहे.याशिवाय मिसिंग लिंक प्रकल्पामुळे सुमारे २० किमी अंतरासाठी आठ लेनचे काम पूर्ण होणार आहे.
-राजेश पाटील,
सहव्यवस्थापकीय संचालक,एमएसआरडीसी,मुंबई