
MSRTC NCMC Card
MSRTC NCMC Card News in Marathi : चंद्रकांत कांबळे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवाशांसाठी तसेच व्यवहारातील सुलभता आणण्यासाठी ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (एनसीएमसी) निर्णय घेतला आहे. नुकतेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कार्डची सक्ती १ ऑगस्टपासून राज्यात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, प्रशासनातील तांत्रिक अडचणी तसेच सावळागोंधळामुळे ही “डेड”लाईन पाळली जाणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण, राज्यातील अनेक भागात एनसीएमसी कार्ड नोंदणी केंद्रे बंद स्थितीत आहेतच पण, प्रशासानाने आधी नोंदणी केलेल्या कार्डांचे वितरण करण्याच्या नावाखाली हे केंद्र बंद ठेवली आहेत. नवीन कार्डांसाठी नाव नोंदणीची वेळ केवळ दोन तास ठेवली आहे.
एसटी प्रवासासाठी सरकारने एनसीएमसी कार्ड ही नवीन योजना आमलात आणली आहे. हे कार्ड घेतल्यानंतर इतर कार्ड दाखविण्याची (उदा. आधार, मतदान कार्ड) गरज भासणार नाही. प्रवाशाना सुलभ प्रवास करता यावा, असा उद्देश यामागे आहे. मात्र, या प्रक्रियेतील सावळा गोंधळ अद्यापही सुरूच आहे.
पुणे विभागात एकूण ९१ एजंट यासाठी नेमले आहेत. या एजंट्समार्फत मे २०२६ पर्यंत जवळपास १ लाख ७० हजार कार्डांची नोंदणी करण्यात आली आहे. मात्र, अजूनही लाखो ज्येष्ठ नागरिकांनी हे कार्ड काढलेले नाही. त्यात वारंवार सर्व्हर डाऊन असणे, केंद्र फक्त दोन तासच उघडे राहणे आणि वितरण सुरू असताना नोंदणी बंद ठेवणे, यामुळे ज्येष्ठ नागरिकांना एनसीएमसी कार्डसाठी केंद्राचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.
एनसीएमसी कार्डची नोंदणी करण्यासाठी सकाळी ९ ते ११ अशी केवळ दोन तासांचीच वेळ देण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून पुण्यातील स्वारगेट येथील केंद्र बंद असून, “ज्यांनी आधी नोंदणी केली आहे त्यांना कार्ड वितरित करण्याचे काम सुरू असल्याने नोंदणी बंद आहे,” असे केंद्रावर सांगितले जात आहे. यंत्रणेच्या या भूमिकेमुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे.
एनसीएमसी कार्ड बनवण्याचे कंत्राट खाजगी ठेकेदारांना देण्यात आले आहे. कार्ड काढण्याची मूळ प्रक्रियाच किचकट आहे. पहिल्यांदा केंद्रावर जाऊन कार्डची नोंदणी करावी लागते आणि त्यानंतर कार्ड घेण्यासाठी पुन्हा त्याच केंद्रावर जावे लागते. या संपूर्ण प्रक्रियेत नागरिकांना साधारण पाच ते सहा वेळा केंद्राच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी १ ऑगस्ट २०२६ पासून एनसीएमसी कार्ड बंधनकारक केले आहे; तर दुसरीकडे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक हे लाभार्थी जेव्हा कार्ड नोंदणीसाठी केंद्रावर जात आहेत, तेव्हा त्यांना केंद्र बंद असल्याचे सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत, मंत्री महोदयांनी ठरवलेल्या मुदतीपर्यंत सर्व लाभार्थ्यांना हे कार्ड खरोखरच मिळू शकेल का ? हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.
राज्यातील सुमारे ५१ लाख नागरिकांनी एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली असून त्यापैकी सुमारे २५ लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित करण्यात आले आहेत. परंतु एनसीएमसी कार्ड वितरकांच्या मनमानी पध्दतीमुळे महिला,ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक यांना एका कार्डसाठी अनेक वेळा चक्रा मारावे लागत आहे.
MSRTC च्या NCMC कार्ड ला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; पुण्यात महिनाभरात १ लाखांहून अधिक अर्ज