
मोदींच्या नावावर मतं मागणारे दादा आपण कुठे आंबे चोरत आहात? अमोल बालवडकरांचा चंद्रकांत पाटलांना सवाल
पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या एका वादग्रस्त विधानामुळे राज्यभरात नवा वाद पेटला आहे. त्यांनी थेट ‘पेपरफुटी’ची तुलना ‘आंबा चोरी’शी केल्यामुळे राजकीय क्षेत्रातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर राजकीय नेते प्रचंड आक्रमक झाले असून, राष्ट्रवादीचे नेते आणि पुणे महापालिकेचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी चंद्रकांत पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मोदींच्या नावावर मत मागणारे चंद्रकांत दादा आपण कुठे आंबे चोरत आहात? असा उपरोधिक सवाल अमोल बालवडकर यांनी विचारला आहे.
अमोल बालवडकर फेसबुक पोस्ट करुन म्हणाले की, पुणे शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि भारतीय जनता पक्षावर एवढी तीव्र टीका, आक्षेपार्ह टिप्पणी आणि पोस्टर्स झळकत असताना महाराष्ट्राचे उच्च तंत्र मंत्र मंत्री चंद्रकांत दादा कुठे आहेत? तुम्हाला कोणीही राजीनामा मागितला नाही तरी कुठे गायब आहात… मोदीजींच्या नावावर मते मागणारे तुम्ही आज मौन का बाळगत आहेत? विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असताना तुमची भूमिका काय आहे? जनतेसमोर येऊन ते आपली भूमिका स्पष्ट का करत नाहीत? ही शांतता नेमकी कशाची आहे? मोदींच्या नावावर फक्त मतं मागायचे, मोदींची अस्मिता अडचणीत आल्यावर घरात लपून बसायचे हेच का तुमचे मोदीजी प्रेम? पुणेकरांच्या मनात एकच प्रश्न आहे, चंद्रकांत दादा कुठे आहे?
कॉकरोच जनता पार्टीच्या पुण्यात झालेल्या भव्य मोर्चानंतर केलेल्या या पोस्टमुळे शहरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. बालवडकर यांच्या या टीकेला मंत्री चंद्रकांत पाटील काय उत्तर देणार, याकडे आता राजकीय वर्तुळासह पुणेकरांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या सोशल मीडिया पोस्टमुळे नव्या राजकीय शाब्दिक संघर्षाची ठिणगी पडण्याची चिन्हे दिसत आहेत.
चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?
पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “एखादा पेपर फुटल्यानंतर.. म्हणजे एखाद्याने एक आंबा चोरला, तर त्याची शिक्षा फाशी नसते ना? आंबा चोरला, तर समज देणं असतं. आणखी काही चोरलं, त्याची शिक्षा ठरली असते. प्रत्येक गोष्टीला.. फाशी फाशी असं नसतं ना,” असे वक्तव्य त्यांनी केले होते.