
पीएमपीची फुकट्या प्रवाशांवर कडक कारवाई; 4 महिन्यांत तब्बल…
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) ने जानेवारी ते एप्रिल २०२६ या चार महिन्यात फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत २८ लाख ५८ हजार रुपये दंड वसूल केला आहे. पीएमपी प्रशासनाने फुकट्या प्रवाशांवर नजर ठेवण्यासाठी ३११ चेकरची नेमणूक केली असून, या चेकरचे काही विशेष तपासणी पथक निर्माण करण्यात आली आहेत. हे पथक अचानकपणे कोणत्याही स्थानकांवर जाऊन प्रवाशांचे तिकीट तपासणी करुन फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत आहेत.
चेकर तिकीट तपासणी दरम्यान प्रवाशांकडे तिकीट नसेल तर ५०० रुपये दंड आकारण्यात येतो. पीएमपी प्रशासनाने प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी ‘आपले पीएमपीएमएल ॲप’,‘स्कॅन’ आणि ‘वाहकांकडून’ रोख रक्कम देऊन तिकीट काढण्याची सोय केलेली असताना देखील काही प्रवासी हे ॲपच्या माध्यमातून तिकीट काढतो असे म्हणून काढत नाहीत. अचानकपणे चेकरने तिकीट चेक केल्यानंतर काही प्रवाशांकडे तिकीट नसल्याचे आढळून येत आहे. अशा वेळी चेकरकडून फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
| महिना | दंड |
|---|---|
| जानेवारी -२०२६ | ७,८२,५०० |
| फेब्रुवारी –२०२६ | ७,४९,५०० |
| मार्च –२०२६ | ६,६४,५०० |
| एप्रिल -२०२६ | ६,६१,५०० |
सर्वसामान्य व्यक्तीला परवडेल असे पीएमपीच्या तिकीटाचे दर ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रवाशांनी विना तिकीट प्रवास करु नये, पीएमपीला सहकार्य करावे. – महेश आव्हाड (अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी)
हे सुद्धा वाचा : चिमुकलीचा खून, मुलाला जंगलात फेकले; ‘या’ कारणावरुन बापाने उचलले टोकाचे पाऊल
पुण्यात पीएमपीची बससेवा कोलमडली
पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) ही शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा कणा मानली जाते. मात्र दररोज ५४ बसेस ब्रेकडाऊनमुळे बंद पडत आहेत. या बससेवेची अवस्था दिवसेंदिवस ढासळत चालल्याचे चित्र समोर येत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए परिसरात सेवा देणाऱ्या पीएमपीच्या बस वारंवार बंद पडत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. मागील २०२४,२०२५ आणि मार्च २०२६ पर्यत पीएमपीच्या तब्बल ४४ हजार ३०४ वेळा बस ब्रेकडाऊन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये भाडेतत्त्वावरील बस ३१ हजार ९०२ वेळा, तर पीएमपीच्या स्वतःच्या मालकीच्या बस १२ हजार ४०२ वेळा बंद पडल्या आहेत. याचा सरासरी विचार करता दररोज सुमारे ५४ बस बंद पडत असल्याचे स्पष्ट होते. या सततच्या बिघाडामुळे कामावर, शाळा, महाविद्यालय किंवा रुग्णालयात जाणाऱ्या नागरिकांचे नियोजन पूर्णपणे कोलमडत आहे.वेळेवर पोहोचणे कठीण झाल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.