
शाळेच्या मुख्य मैदानावर जुने लोखंडी बाके (बेंचेस), तुटलेली कपाटे, गंजलेले पत्रे आणि टाकाऊ शैक्षणिक साहित्याचा मोठा ढिगारा साचला आहे. हे साहित्य अनेक महिन्यांपासून उघड्यावर असल्याने पूर्णपणे गंजले आहे. मुले खेळताना किंवा धावताना या साहित्याला लागून मोठी दुखापत होण्याची, तसेच धनुर्वातासारखा (Tetanus) धोकादायक संसर्ग होण्याची भीती निर्माण झाली आहे.
Maharashtra Politics : पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी रस्सीखेच; बहुमतानंतर सत्तासमीकरणांची लगबग
एकीकडे सरकार ‘फिट इंडिया’ मोहिमेचा गाजावाजा करत असताना, दुसरीकडे मनपा शाळेतील मुलांना खेळण्यासाठी हक्काचे मैदानही उपलब्ध नाही. मैदानातील मोठा हिस्सा भंगार साहित्याने व्यापल्यामुळे शारीरिक शिक्षणाचे (PT) तास घेणे अशक्य झाले आहे. मोकळी जागा नसल्याने मुलांना नाईलाजाने वर्गात किंवा अरुंद बोळांमध्ये बसून राहावे लागत आहे.
हे भंगार हटवण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीने वारंवार तोंडी तक्रारी केल्या आहेत, मात्र प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. ”आमची मुले शाळेत शिक्षणासाठी जातात की भंगार डेपोत? एखादा मोठा अपघात होण्याची प्रशासन वाट पाहत आहे का?” असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केला आहे. प्रशासनाने हे साहित्य तत्काळ न हटवल्यास मनविसे (वडगाव शेरी) कडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा विभाग अध्यक्ष कुलदीप घोडके यांनी दिला आहे.
विद्यार्थ्यांच्या खेळासाठी आणि व्यायामासाठी महापालिकेच्या माध्यमातून ५० लाख रुपये खर्चून उभारलेले सिमेंट काँक्रिटचे मैदान आज वापराविना पडून आहे. संत ज्ञानेश्वर विद्यालयातील या मैदानासाठी झालेला हा अवाढव्य खर्च लोकप्रतिनिधींचा हट्टीपणा आणि प्रशासनाच्या बेपर्वाईमुळे वाया गेल्याचा खळबळजनक आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने (मनविसे) केला आहे.
सन २०२२ मध्ये या मैदानाच्या कॉंक्रिटीकरणासाठी निधी मंजूर झाला होता. मात्र, कनिष्ठ अभियंत्याने हा निधी दुसऱ्या कामासाठी वळवल्यामुळे या मैदानाचे काम अर्धवटच राहिल्याचा आरोप होत आहे.विशेष म्हणजे, उद्घाटन झाल्यापासून आजतागायत एकाही विद्यार्थ्याला या मैदानावर खेळता आलेले नाही. त्यामुळे ५० लाख रुपये खर्चून नक्की साध्य काय झाले, असा प्रश्न पालक आणि नागरिक विचारत आहेत.
महापालिकेची मुदत संपत असल्याने श्रेयवादासाठी आणि घाईघाईत या अर्धवट कामाचे उद्घाटन उरकण्यात आले, मात्र त्यानंतर विद्यार्थ्यांच्या हिताकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले.मातीच्या मैदानावर सिमेंट कॉंक्रिटीकरणाचा घाट का घातला गेला? जर खेळाडूंना याचा वापरच करता येत नसेल, तर हा निधी कोणाच्या फायद्यासाठी खर्च केला? असे सवाल मनविसेने उपस्थित केले आहेत. या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.