
फोटो सौजन्य - Social Media
बारामती प्रतिनिधी : बारामती शहरासह औद्योगिक वसाहत परिसर आणि इंदापूर तालुक्यातील बहुतांश भागांमध्ये रविवारी सायंकाळी मान्सूनने दमदार हजेरी लावली. काही ठिकाणी मुसळधार तर काही भागांत ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने परिसर जलमय झाला. विशेषतः भवानीनगर, सणसर, काटेवाडी आणि आसपासच्या भागांत सलग तीन तासांहून अधिक काळ पाऊस कोसळल्याने शेतशिवारांमध्ये पाणी साचले.
सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वातावरणात अचानक बदल होऊन वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. भवानीनगर, सणसर, काटेवाडी, पिंपळी आणि परिसरातील अनेक गावांमध्ये पावसाचा जोर वाढत गेला. भवानीनगर परिसरात तब्बल तीन तासांपेक्षा अधिक काळ सुरू असलेल्या पावसामुळे अनेक शेतांमध्ये पाणी साचून वाहू लागले. काही ठिकाणी लहान नाले आणि ओढ्यांनाही पाणी आल्याचे चित्र पाहायला मिळाले.
बारामती शहर आणि औद्योगिक वसाहत परिसरातही सुमारे पाऊण तास मुसळधार पाऊस झाला. अचानक कोसळलेल्या पावसामुळे काही रस्त्यांवर पाणी साचले असून वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागला. मात्र माळेगाव परिसरात तुलनेने कमी पाऊस झाला असून तेथे रिमझिम स्वरूपाचा पाऊस नोंदवण्यात आला.
या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असला तरी काही पिकांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः आंबा आणि इतर फळपिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. अनेक शेतांमध्ये पाणी साचल्याने पिकांच्या स्थितीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा पाऊस फायदेशीर ठरणार असल्याचे कृषी क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या दमदार पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. मान्सूनच्या आगमनानंतर या भागात झालेला हा पहिलाच जोरदार पाऊस असल्याने शेतीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, विजांच्या कडकडाटासह रात्री उशिरापर्यंत इंदापूर तालुक्यातील अनेक भागांत पावसाची संततधार सुरू होती. हवामानातील बदल आणि मान्सूनच्या सक्रियतेमुळे आगामी काही दिवसांतही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.