
उन्हामुळे जनावरांच्या आरोग्याला धोका; दूध उत्पादन घटण्याची शक्यता
चास वाडा : खेड तालुक्यासह चास वाडा परिसरात सध्या उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचा परिणाम जनावरांच्या आरोग्यावर होत असल्याचे दिसत आहे. वाढत्या तापमानामुळे जनावरांना उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे. दूध देणाऱ्या जनावरांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पशुपालकांनी उन्हाळ्याच्या दिवसांत जनावरांची विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे आवाहन पशुवैद्यकीय विभागाने केले आहे.
सध्या दुपारच्या वेळी तापमानात मोठी वाढ होत आहे. गोठ्यांमध्ये पुरेशी हवेशीर व्यवस्था नसलेल्या ठिकाणी जनावरांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी सावलीची व्यवस्था अपुरी असल्याने तसेच झाडांची कमतरता असल्यामुळे जनावरे कडक उन्हातच उभी राहतात. परिणामी त्यांना उष्माघात, भूक मंदावणे, अशक्तपणा आणि दूध उत्पादन घटणे अशा समस्या उद्भवत आहेत. विशेषतः दुधाळ गायी व म्हशींना उष्णतेचा अधिक परिणाम होत आहे. दूध उत्पादनात घट होत असल्याची तक्रार काही पशुपालकांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच दुपारच्या कडक उन्हात जनावरांना चरण्यासाठी बाहेर नेले जात असल्याने त्यांना उष्माघाताचा धोका अधिक वाढत आहे.
तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यात जनावरांना स्वच्छ व थंड पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देणे अत्यंत आवश्यक आहे. गोठ्यांवर शेड किंवा ताडपत्री लावून सावलीची व्यवस्था करावी. गोठ्यांमध्ये हवा खेळती राहील अशी रचना असावी. दुपारच्या कडक उन्हात जनावरांना बाहेर न काढता सकाळी लवकर किंवा संध्याकाळच्या वेळीच त्यांना चरण्यासाठी सोडावे. तसेच पौष्टिक व हिरव्या चाऱ्याची योग्य व्यवस्था करणेही महत्त्वाचे आहे.
काही ठिकाणी जनावरांना वेळेवर लसीकरण व उपचार न मिळाल्याने आजार वाढण्याची शक्यता असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे जनावरांमध्ये अशक्तपणा, ताप, श्वासोच्छ्वासाचा त्रास किंवा भूक न लागणे अशी लक्षणे दिसल्यास त्वरित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा, असेही सांगण्यात आले आहे.
उन्हाळ्यात जनावरांना थंड व स्वच्छ पाणी सतत उपलब्ध करून द्यावे. गोठ्यात पुरेशी सावली व हवेशीर व्यवस्था असावी. दुपारच्या वेळेत जनावरांना विश्रांती द्यावी. शरीरावर पाणी शिंपडल्यास उष्माघात टाळण्यास मदत होते. कोणतीही लक्षणे दिसल्यास त्वरित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा. — डॉ. महेश शेळके, पशुवैद्यकीय अधिकारी, चाकण
आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये
उन्हाची तीव्रता आगामी काळात आणखी वाढण्याची शक्यता असल्याने पशुपालकांनी सतर्क राहून जनावरांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन पशुवैद्यकीय विभागाकडून करण्यात आले आहे.