
पाटसमध्ये राजे उमाजी नाईक फलकाची तोडफोड; जय मल्हार क्रांती संघटना आक्रमक
पाटस : दौंड तालुक्यातील पाटस येथे मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या स्तंभावरील विद्युत रोषणाईयुक्त फलकाची अज्ञात व्यक्तींनी दगडफेक करून तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली आहे. शनिवारी (दि. २८) रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडल्याचा आरोप जय मल्हार क्रांती संघटनेने केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ जय मल्हार क्रांती संघटना, समाजबांधव आणि ग्रामस्थांनी पाटस पोलिस चौकीवर मुक मोर्चा काढत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करणारे निवेदन पोलिसांना दिले.
प्राथमिक माहितीनुसार, पाटस येथील मुख्य प्रवेशद्वाराजवळील जुना बाजारतळ परिसरातील क्रांतीस्तंभावर लावण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक फलकासह जय मल्हार क्रांती संघटनेच्या नावाच्या फलकाचीही दगडफेक करून तोडफोड करण्यात आली. शनिवारी सकाळी हा प्रकार जय मल्हार क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष सोमनाथ खोमणे यांच्या निदर्शनास आला. घटनेची माहिती मिळताच संघटनेचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब गाडेकर व पोलिस हवालदार जालिंदर बंडगर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी केली; मात्र संबंधित घटना कॅमेऱ्यात कैद न झाल्याने तपासात अडचणी येत आहेत.
तातडीने कारवाई करण्याची मागणी
या घटनेच्या निषेधार्थ जय मल्हार क्रांती संघटनेचे नेते बापूसाहेब खोमणे, तालुका अध्यक्ष दादासाहेब खोमणे, उपसरपंच बाबा कोळेकर तसेच पंचायत समिती सदस्य शिवाजी ढमाले यांच्यासह ग्रामस्थांनी पाटस पोलिस चौकीवर मुक मोर्चा काढला. महापुरुषांची बदनामी व विटंबना करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी पोलिसांनी संबंधितांवर चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ जय मल्हार क्रांती संघटनेने रविवारी (दि. २९) पाटस गाव बंदची हाक दिली होती.
सीसीटीव्ही कॅमेरे बंद; ग्रामस्थांत नाराजी
पाटस ग्रामपंचायतीने मुख्य रस्ते व चौकांमध्ये मोठा खर्च करून बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे अनेक ठिकाणी बंद अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून ग्रामस्थांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कॅमेरे बंद असल्याने गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांनाही अडचणी येत आहेत. ग्रामपंचायतीने तातडीने कॅमेरे दुरुस्त करून कार्यान्वित करावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.