
सासवडमधील महिलांचा प्रशासनाविरोधात एल्गार; नगरपालिकेत कचऱ्याच्या बादल्या घेऊन जोरदार निषेध
सासवड : स्वच्छतेच्या बाबतीत संपूर्ण देशातून विविध स्तरावरील पुरस्कार पटकावून आदर्श ठरलेल्या पुरंदर तालुक्यातील सासवड शहराची अस्वछतेकडे वाटचाल सुरु झाली आहे. रस्त्यावर कचरा साठत असून घंटागाडी वेळेला येतही नाही. अनेक दिवसापासून गढूळ पाणी पिण्यासाठी येत आहे. नगरपरिषदेच्या ढिसाळ कारभाराविरोधात सासवडमधील जनता आक्रमक झाली असून महिलांनी प्रशासनाच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. कचऱ्याच्या बदल्या थेट नगर परिषदेत घेवून जोरदार निषेध केला आहे.
सासवड नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ११ मधील महिला जोरदार आक्रमक झाल्या. तुंबलेल्या ड्रेनेज लाईन, गढूळ पाणीपुरवठा, रस्त्यावरील साठलेला कचरा अशा अस्वच्छतेच्या समस्यांमुळे त्रस्त झाल्याने नगरपालिकेच्या मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांच्या दालनात बदल्यामध्ये कचरा आणून अनोखे आंदोलन केले. सहा-सहा दिवस कचरा उचलला जात नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच नळाला गढूळ व आरोग्यास बाधक पाणी येत असल्याची तक्रारही महिलांनी केली. रस्त्यांवरील स्ट्रीट लाईटला लावण्यात आलेले छोटे बल्ब अपुरा प्रकाश देत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. कचरा गाडीवरील चालकांची अरेरावी, कांबळेश्वर मंदिर परिसरातील कचरा डेपो, तसेच नमो उद्यानातील काम करणाऱ्या ठेकेदाराच्या कामगारांचे अवैध वास्तव्य विविध प्रश्न उपस्थित करून महिलांनी प्रशासनासमोर मांडले.
समस्या मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करू
नगरसेविका हेमलता इनामके, दिपाली जगताप, सासवडचे भाजप शहराध्यक्ष आनंद जगताप, शिवसेना शहराध्यक्ष मिलिंद इनामके, सुरेखा जगताप, जयश्री जगताप, संगीता भिंताडे, भाग्यश्री जगताप, दीपाली खेनट, सविता फडतरे, सुनिता महामुनी, योगिता काकडे, सुनिता यादव, अपेक्षा जगताप, अर्चना जगताप, अंकिता जगताप यांच्यासह इतर महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होत प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला.
दरम्यान मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण हे कार्यालयात उपस्थित नसल्याने नगरपालिकेच्या वतीने ओंकार शिंदे आणि सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक राजन जगताप यांनी आंदोलक महिलांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. संबंधित समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल व प्रश्नांवर तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
हे सुद्धा वाचा : १२ हजाराची लाच मागणं भोवलं! तलाठ्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई
ठोस तोडगा काढला नाही तर तीव्र आंदोलन
आठ दिवसांत प्रशासनाने सासवड मधील समस्या सोडवाव्यात. दररोज नियमितपणे घंटागाडी सुरू करून साचलेल्या कचऱ्याची तत्काळ विल्हेवाट लावावी. मागील २० वर्षांपासून प्रलंबित रस्त्यांचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा. आरोग्याचा धोका टाळण्यासाठी परिसरात योग्य ड्रेनेज व्यवस्था त्वरित उभी करावी. तसेच नागरिकांच्या समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. या प्रश्नांवर ठोस तोडगा काढला नाही तर नगरपालिकेसमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नगरसेविका हेमलता इनामके आणि दिपाली जगताप यांनी दिला.