
शेतकरी आर्थिक संकटात! सोलर पंप चार दिवसात बिघडला, महावितरणकडून दुर्लक्ष
कर्जत: कर्जत तालुक्यातील एका शेतकऱ्याने आपल्या शेतीमधील झाडे जगण्यासाठी लावलेले सोलर पॅनल चार दिवसात बंद पडले. सोलर पॅनल बंद पडल्याने त्या शेतकऱ्याचे शेत जमिनी मधील झाडे सुकू लागली असून महावितरण कंपनी कडे शेतकरी फेऱ्या मारत आहे. मात्र महावितरण कंपनीकडून कोणतेही प्रकारची दखल घेतली जात नसल्याने शेतकरी अडचणीत आला असून कशेळे ते कर्जत अशा फेऱ्या शेतकऱ्याला माराव्या लागत आहे.
कर्जत तालुक्यातील मोग्रज ग्रामपंचायत मधील हद्दीतील शेतकरी मारूती गोपाळ धुळे यांनी आपल्या शेत जमिनीसाठी महावितरण कंपनीकडे वीज पुरवठा करण्यासाठी अर्ज केला. त्यावेळी महावितरण कंपनीच्या कर्जत येथील कार्यालयाने त्यांना सोलर पॅनल बसविण्याची सूचना केली. त्यानुसार महावितरण कंपनीने सोलर कंपनीकडे मारुती धुळे यांच्या शेती पंपासाठी सोलर बसवण्यास प्रस्ताव केला.सात्विक ऊर्जा या कंपनीकडे महावितरणकडून जानेवारी २०२६ मध्ये प्रस्ताव करण्यात आला. धुळे यांच्या मोगरज ग्रामपंचायत मधील पिंपळपाडा मधील शेत जमिनीत विजेचे खांब आणणे शक्य नसल्याने सौर ऊर्जेचा प्रस्ताव पुढे पाठवण्यात आला. सौर कृषी पंप योजना अंतर्गत ऑफ,ग्रिड सोलर पंप एक मार्च रोजी बसवण्यात आला आणि त्यानंतर तेथील शेत जमिनी मध्ये विजेच्या सहाय्याने पाण्याचे पंप सुरू झाले.
मारुती धुळे यांच्या शेत जमिनीत शेती करण्यासाठी त्यांनी कूपनलिका खोदली असून त्या कूपनलिकेतून शेती साठी पाणी पोहचवण्यासाठी सौर ऊर्जेच्या आधारे पंप जोडण्यात आला.त्यानंतर शेतकरी मारुती धुळे यांच्या शेती मधील झाडे यांना पाणी मिळू लागले तसेच तेथे शेत घर बांधण्यासाठी माती पासून विटा पाडण्याचे काम देखील सुरू केले. मात्र अवघ्या चार दिवसात सौर ऊर्जेतून वीज निर्माण होणे बंद झाले आणि त्यांनंतर काय होते हे तपासण्यासाठी सात्विक ऊर्जा कंपनीकडे संपर्क करू लागले. सात्विक ऊर्जा ही कंपनी नागपूर येथील असल्याने या कंपनीचे अधिकारी मुरबाड येथील कार्यालयात बसतात याची माहिती झाल्यानंतर मारुती धुळे एसटी गाडीमधून मुरबाड येथे पोहचले.
मुरबाड येथे संबंधित कंपनीचे कोणीही भेटत नसल्याने शेवटी धुळे यांनी कर्जत महावितरण कार्यालयात येरझऱ्या मारण्यास सुरुवात केली. तिकडे शेती मध्ये लावलेली झाडे जगण्यासाठी धुळे यांना टँकर मधून पाणी आणावे लागत आहे.तर सात्विक ऊर्जा या कंपनीचा अधिकारी कोणाचेही फोन उचलत नसल्याने शेतकरी संकटात आला आहे. शेतकऱ्याची सात्विक ऊर्जा कडून फसवणूक झाली असून शेतकऱ्यांची शेती देखील पाणी नसल्याने करपून गेली आहे.सध्याच्या कडक उन्हात शेतमध्ये हिरवेपण गायब झाले असून आता केवळ ओसाड रान धुळे यांच्या शेतात दिसून येत आहे.
माझी फसवणूक झाली असून शेतकऱ्यांना सात्विक ऊर्जा कंपनीकडून त्रास दिला जात आहे.संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना आम्ही मुरबाड मध्ये जाऊन भेटण्याचा प्रयत्न केला, मात्र काहीही फायदा झाला नाही.आता कर्जत महावितरण कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत असून शेतकऱ्यांची अशी फसवणूक कोणी करू नये, अशी प्रतिक्रिया शेतकरी मारुती धुळे यांनी दिली.
आम्ही संबंधित शेतकऱ्यांचा पंप तत्काळ सुरू व्हावा म्हणून सात्विक ऊर्जा कंपनीकडे पत्र व्यवहार केला असून मेल वर संबंधित शेतकऱ्यांची तक्रार नोंद केली आहे. त्याचवेळी संपर्क करण्याचा देखील प्रयत्न सुरू आहे, अशी प्रतिक्रिया महावितरण कर्जत उप अभियंता चंद्रकांत केंद्रे यांनी दिली.