गाडी सुटण्याच्या ३० मिनिटांपूर्वीपर्यंत 'बोर्डिंग' बदला, तिकीट गैरवापर रोखण्यासाठी रेल्वेच्या नव्या सुधारणा; खऱ्या प्रवाशांना दिलासा
प्रवाशांच्या सोयीसाठी आणि तिकीट प्रणालीतील गैरवापर रोखण्यासाठी भारतीय रेल्वेने महत्त्वाचे निर्णय घेतले असून, लवकरच प्रवाशांना गाडी सुटण्याच्या ३० मिनिटांपूर्वीपर्यंत आपले बोर्डिंग स्टेशन बदलण्याची सुविधा मिळणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी या पाच नव्या सुधारणांना मंजुरी दिली. यामुळे २०२६ मधील रेल्वे सुधारणा उपक्रमांची संख्या आता नऊवर पोहोचली आहे. प्रवाशांना कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता तिकीट उपलब्ध व्हावे आणि शेवटच्या क्षणी होणारी सट्टेबाजीची बुकिंग थांबवावी, हा या सुधारणांचा मुख्य उद्देश असल्याचे वैष्णव यांनी सांगितले.(फोटो सौजन्य – istock)
तत्काळ तिकीट प्रणालीचा गैरवापर आणि तिकिटांचा काळाबाजार ही मोठी समस्या बनली होती. यावर उपाय म्हणून रेल्वेने बॉट्स आणि फसवे सॉफ्टवेअर ओळखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यास सुरुवात केली आहे. तसेच आधार आधारित ओटीपी पडताळणी सुरू करण्यात आली. डेटा विश्लेषणातून आयआरसीटीसी प्रणालीतील सुमारे ३ कोटी बनावट खाती शोधून काढून ती बंद करण्यात आली असून, त्यामुळे तिकिटांच्या उपलब्धतेत सुधारणा झाल्याचा दावा रेल्वेने केला आहे.
पूर्वी केवळ मूळ स्थानकावरच तिकीट रद्द करण्याची अट होती. ती आता काढून टाकण्यात येणार असून, देशातील कोणत्याही रेल्वे स्थानकावरून तिकीट रद्द करता येणार आहे.ई-तिकिटासाठी टीडीआर (Ticket Deposit Receipt) दाखल करण्याची अटही हटवण्यात आली असून, तिकीट रद्द केल्यानंतर परतावा स्वयंचलितपणे दिला जाणार आहे.
गाडी सुटण्याच्या ३० मिनिटांपूर्वीपर्यंत प्रवास वर्ग (क्लास) अपग्रेड करण्याची संधी मिळणार आहे. पूर्वी ही सुविधा केवळ आरक्षण चार्ट तयार होण्यापूर्वीच उपलब्ध होती. नवीन नियमानुसार, प्रवासी गाडी मूळ स्थानकावरून सुटण्याच्या ३० मिनिटांपूर्वीपर्यंत डिजिटल पद्धतीने आपले बोर्डिंग स्टेशन बदलू शकतील. त्यामुळे एखादा प्रवासी मूळ स्थानकावर गाडीत चढू शकला नाही तरी त्याची जागा रद्द होणार नाही आणि तो पुढील सोयीच्या स्थानकावरून प्रवास करू शकेल.
प्रवाशाना अधिक नियोजन करता यावे यासाठी तिकीट रद्द करण्याच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. पूर्वी असलेली ४८, १२ आणि ४ तासांची मर्यादा आता अनुक्रमे ७२, २४ आणि ८ तास करण्यात आली आहे. तसेच आरक्षण चार्ट आता गाडी सुटण्याच्या ४ तासांऐवजी ९ ते १८ तास आधी तयार केला जाणार आहे. यामुळे प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना पर्यायी नियोजन करता येणार आहे.






