संतोष पेरणे/ कर्जत : कोणत्याही परवाना विना लाल मातीचं उत्खनन करणाऱ्या माफियांनी डोंगर पोखरले आहेत. गैर मार्गाने माती उपसणाऱ्यांमुळे असंख्य जुनी झाडे मुळापासून नष्ट होत आहेत. या माफियांनी आता लाल मातीसाठी भीमाशंकर अभयारण्य भागातील जमिनीवर धडक दिली असून वन विभाग सुस्त आहे.दरम्यान,लाल माती तस्करी वरील कारवाईनंतर नवी मुंबईत माती पाठवण्यासाठी दबाव वाढला असून शेतकरी देणार नसतील तर वन क्षेत्रात जावून लाल माती उकरून काढण्यासाठी आणि बेकायदा वाहतूक करण्याकडे या माती तस्करांच्या लक्ष लागून राहिले आहे.
कर्जत तालुक्यातून चोरीला जात असलेली माती आणि त्या मातीमुळे डोंगर पोखरले जाण्याचे प्रमाण मागील काही वर्षात वाढले आहेत. कर्जत तालुक्यातील जमिनी मध्ये असलेली लाल माती ही नवी मुंबई आणि अन्य भागात मैदाने विकसित करण्यासाठी विशेष पसंती दिली जाते.त्यामुळे तालुक्यातील खांडस, ओलमन, नांदगाव आणि पाथरज ग्रामपंचायत मधून लाल मातीचे उत्खनन करण्याकडे माती माफिया यांचे प्रयत्न सुरू होते.त्यात स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांच्या जमिनी घेवून माती काढली जात होती,परंतु शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचे प्रमाण मोठे असून लाल माती काढून देणाऱ्यांची चांगलीच चांदी होत आहे. मुख्य इतक्या मोठ्या प्रमाणात गैर प्रकार होत असतानाही वनविभाग मात्र मूग गिळून गप्प आहे, असा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
कर्जत तालुक्याच्या बाहेरील हायवा गाड्या या लाल माती नेण्यासाठी कर्जत तालुक्यात रात्रीच्या अंधारात येतात आणि माती भरून वाहतूक करतात.त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी फसवणूक होत आहे. कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी कर्जत तहसीलदार यांच्याकडून झालेल्या कारवाई नंतर फसवणूक झालेले शेतकरी पुढे येऊ लागले आहेत.शेतकरी वर्ग आपली फसवणूक होत असल्याने लाल माती काढून देत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लाल माती काढण्यासाठी आता जमिनीचे मालक अन्य ठिकाणचे असल्याचे हेरून माती काढण्यात येत आहे.
शेतकऱ्यांकडून विरोध होऊ लागल्याने लाल माती काढण्यासाठी या माफिया कडून आता भीमाशंकर अभयारण्य भागाला लक्ष्य केले जात आहे.या भागाकडे पाहायला वन विभाग जागेवर नसल्याने लाल मातीच्या त्या जमिनी जवळच्या वाटू लागल्या आहेत.त्यात लाल मातीचे उत्खनन करणारे हे लोक त्यासाठी झाडे देखील जमिनीपासून वेगळी करण्याचे काम केले जात आहे.नांदगाव ग्रामपंचायत मधील शेवटच्या टोकाच्या गावांना लागून भीमाशंकर अभयारण्य असून त्यालगत लाल मातीचे डोंगर आता फोडले जात आहेत. अभयारण्य भागाची देखरेख करणारे वन विभाग यांचे कार्यालय हे पुणे जिल्ह्यात असल्याने लाल माती उत्खनन करणारे यांची चांदी झाली आहे.
शेतकरी अडवू लागल्याने लाल माती तस्कर यांनी आता सुरक्षित पर्याय म्हणून भीमाशंकर अभयारण्य आणि वन जमिनी मध्ये जावून लाल माती उत्खनन सुरू आहे.त्यासाठी लहान झाडांबरोबर मोठी झाड डोंगर पोखरले जात असताना कोसळत आहेत.वन विभाग आणि भीमाशंकर अभयारण्य यांच्या संरक्षित वन क्षेत्रात लाल माती काढणारे पोहचले असल्याने वन संपदा धोक्यात आले आहे.