'सनाधरा रिसॉर्ट'मध्ये मृत्यूचा सापळा; निष्काळजीपणामुळे दोन मजले कोसळले, स्लॅब कोसळून कामगार गंभीर जखमी
रविवारी सायंकाळी 5.30 सुमारास जेव्हा हा ढिगारा कोसळला, तेव्हा वेल्डिंगचं काम करणारा मनोज नावाचा उत्तर भारतीय कामगार थेट तिसऱ्या मजल्यावरून खाली कोसळला. लोखंडी अवजड बीममध्ये त्याचा पाय असा काही अडकला, की तो थेट मृत्यूच्या दारात उभा होता. पण म्हणतात ना, ‘देव तारी त्याला कोण मारी अशी घटना तेथे पाहायला मिळाली.
या घटनेची माहिती मिळताच खोपोलीच्या ‘हेल्प फाउंडेशन’चे गुरुनाथ साठेलकर आणि त्यांची टीम जीवाची बाजी लावून घटनास्थळी पोहोचली. वरून कधीही कोसळेल अशा अत्यंत धोकादायक स्ट्रक्चरच्या खाली उभे राहून, तब्बल ५ तास या रेस्क्यू टीमने शर्थीचे प्रयत्न केले आणि अखेर मृत्यूच्या जबड्यातून मनोजला सुखरूप बाहेर काढलं. या भीषण अपघातात फक्त मनोजच नाही, तर तिथं काम करणारे तीन स्थानिक आदिवासी बांधवही जखमी झालेत, त्यांच्यावर सध्या कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार, या रिसॉर्ट चालकाने एवढं मोठं तीन मजली स्ट्रक्चर उभं करताना कोणत्याही तज्ज्ञाचा सल्ला घेतला नव्हता. हा सरळ सरळ निष्पाप लोकांच्या जिवाशी केलेला खेळ आहे. घटनास्थळी कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण नवले, अनिल सोनोने आणि त्यांच्या पथकाने तात्काळ धाव घेतली असून पोलीस आता याप्रकरणी चौकशी करत आहेत.
रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब अचानक कोसळला. त्यावेळी वेल्डिंगचे काम करणारा मनोज नावाचा उत्तर भारतीय कामगार तिसऱ्या मजल्यावर काम करत होता. स्लॅब कोसळताच तो खाली पडला आणि लोखंडी बीममध्ये त्याचा पाय अडकल्याने तो ढिगाऱ्याखाली अडकून पडला. घटनास्थळावरील परिस्थिती अत्यंत धोकादायक होती. इमारतीचा उर्वरित भागही कधीही कोसळू शकत असल्याने बचावकार्य मोठ्या जोखमीचे ठरले.
घटनेची माहिती मिळताच खोपोली येथील हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर आणि त्यांचे बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जीवाची पर्वा न करता बचाव पथकाने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगाराला बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न सुरू केले. सुमारे पाच तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर मनोजला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.
या घटनेनंतर स्थानिकांकडून बांधकामाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. संबंधित बांधकामासाठी आवश्यक परवानग्या, वास्तुविशारद किंवा अभियंत्यांचे मार्गदर्शन नसल्याचा दावा काही स्थानिकांनी केला आहे. तसेच सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्यात आले होते का, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. या आरोपांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. संबंधित प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.
या दुर्घटनेनंतर संबंधित बांधकामाची वैधता, सुरक्षा मानकांचे पालन आणि जबाबदारी निश्चित करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही जोर धरत आहे.






