
कर्जतमध्ये मुसळधार पावसाचा कहर; उल्हास नदीला पूर, चार पूल पाण्याखाली
सोमवारी (6 जुलै 2026) रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे उल्हास नदीसह चिल्हार आणि पेज नद्यांनाही पूर आला. नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत गेल्याने सर्वप्रथम मोहिली येथील पूल पाण्याखाली गेला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सुरक्षा कठडे उभारले आणि वाहतूक पूर्णपणे बंद केली.
Karjat News : कर्जतच्या पळसदरीत दरड कोसळली; पाच वाहने मातीखाली, मुख्य रस्ता बंद
यानंतर उल्हास नदीवरील दहिवली-मालेगाव पूलही पाण्याखाली गेला. या ठिकाणी दहिवली गावाचे पोलीस पाटील अनिल बारणेकर यांनी स्वतः पुलाच्या दहिवली बाजूला उभे राहून नागरिकांना पुलावरून जाण्यापासून रोखले. वेगाने वाहणाऱ्या पाण्यामुळे पुलावरून वाहतूक करणे अत्यंत धोकादायक बनले होते.
दरम्यान, दहिवली येथे सुमारे २५ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या नव्या पुलाच्या वरूनही पूराचे पाणी वाहत असल्याचे चित्र समोर आले आहे. अद्याप पूर्णत्वास न आलेल्या या पुलावरून पाणी गेल्याने त्याच्या रचनेबाबत आणि पूरनियोजनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. धामोते बाजूला पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवून कोणालाही पुलावरून जाण्यास मज्जाव केला, त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
दुसरीकडे, नेरळ-कळंब मार्गावरील वाहतूकही रात्रीपासून पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. गेल्या वर्षी उल्हास नदीवर शेलू येथे बांधण्यात आलेल्या नव्या पुलावरूनही पूराचे पाणी वाहू लागल्याने प्रशासनाने हा मार्गही बंद केला. शेलू गावाचे पोलीस पाटील मनोज पाटील यांनी नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत पूल ओलांडू नये, असे आवाहन केले आहे. दरम्यान, उल्हास नदीचे पाणी शेलू गावातील नदीकाठच्या चाळींमध्येही शिरल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याचबरोबर ठाणे जिल्ह्याच्या सीमेवरील पाषाण येथील पुलावरूनही पाणी वाहत असल्याने त्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मोहिली, दहिवली, शेलू आणि पाषाण हे चारही पूल पाण्याखाली गेल्याने नेरळपासून कळंब आणि पाषाणपर्यंतच्या अनेक गावांचा परस्पर संपर्क तुटला आहे.
प्रशासन, पोलीस आणि स्थानिक यंत्रणा परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. नदीकाठच्या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून पूरग्रस्त भागात अनावश्यक प्रवास टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुसळधार पावसाचा जोर कायम राहिल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.