Raigad News: माथेरानमध्ये ३२ जणांना ई-रिक्षा, मग उर्वरित ६२ जणांचं काय? शहरात पुन्हा आंदोलनाची चाहूल
माथेरानमध्ये ब्रिटिश काळापासून हातरिक्षाच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक होत होती. त्यानंतर २०१२ मध्ये हातरिक्षाचालकांकडून सुरु असलेल्या अमानवी प्रथेबद्दल सर्वोच्च न्यायालयात लढाई लढली गेली आणि २०२२ मध्ये पर्यावरणपूरक प्रदूषण विरहित ई-रिक्षा चालवण्यास परवानगी दिली. माथेरानमध्ये अधिकृत असे ९४ हातरिक्षाचालक असून त्यांच्यापैकी आजच्या तारखेला ३२ हातरिक्षाचालकांना ई-रिक्षा शासनाने दिली आहे. त्यातील २० हातरिक्षाचालकांना स्वतः ई-रिक्षा खरेदी करण्याची परवानगी दिली असून माथेरान नगरपरिषदेच्या ६ ई-रिक्षा या १२ हातरिक्षा चालकांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आजच्या घडीला ३२ हातरिक्षाचालकांना ई-रिक्षा मिळाली आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
अजूनही ६२ हातरिक्षाचालक हे शहरात हातरिक्षा ओढून आपले कुटुंब चालवत असून त्यांच्यासाठी श्रमिक रिक्षा संघटना यांच्याकडून आवाज उठवला जात आहे. माथेरान शहरात असलेल्या सर्व हातरिक्षा बंद कराव्यात आणि हातरिक्षाचालकांचे पुनर्वसन करावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत.
दुसरीकडे माथेरानमध्ये येणारा एकमेव रस्ता हा नेरळ-माथेरान घाटरस्ता असून त्या ठिकाणी २५० टॅक्सेमधून प्रवासी माथेरान शहरात येत असतात. त्यामुळे २५० ई-रिक्षा असाव्यात आणि पर्यटकांना कोणत्याही अडथळा विना माथेरान शहरात येता यावे, पर्यटन करता यावे असा मतप्रवाह देखील पुढे आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने महाराष्ट्र शासनाने सर्व हातरिक्षाचालकांच्या हाती ई-रिक्षा दिल्या नसल्याने श्रमिक रिक्षा संघटना आंदोलन करीत आहे. त्यात केवळ २० हातरिक्षाचालकांना स्वतःची ई-रिक्षा मिळाली असून अन्य १२ हातरिक्षाचालकांना माथेरान पालिकेने रिक्षा दिली आहे. त्यामुळे त्या १२ हातरिक्षाचालकांचे पुनर्वसन देखील महत्वाचे असून त्यांना देखील स्वतःची ई-रिक्षा हवी आहे. त्यांना दिलेली ई-रिक्षा शासनाची असल्याने त्यांच्यावर देखील अनेक बंधने आली आहेत.
माथेरानमधील हातरिक्षाचालकांच्या पूर्वसनाचे आदेश असून देखील त्या ६२ हातरिक्षाचालकांच्या हाती ई-रिक्षा देण्याची कोणतीही तयारी माथेरान नगरपरिषद, माथेरान सनियंत्रण समिती आणि शासनाकडे दिसत नाही. माथेरान नगरपरिषदेने माथेरान शहरात असलेल्या सर्व ९४ हातरिक्षाचालकांना पर्यावरणपूरक ई-रिक्षा मिळाली, असे दराव घेतला आहे. त्याबाबत कोणताही निर्णय सनियंत्रण समिती घेताना दिसत नाही.
माथेरानमध्ये हातरिक्षाचालकांना ई-रिक्षा मिळाल्यानंतर काही ई-रिक्षाचालकांकडून व्यवसाय करताना काही अडथळे येत आहेत. त्यामुळे पर्यटक, नागरिक, विद्यार्थ्यांना वेळेवर सेवा मिळत नाही. काही ई-रिक्षाचालक हे मनमानी करीत असून कोणत्याही वेळी आपली ई-रिक्षा व्यवसाय करण्यासाठी येत असल्याने त्या कामचुकार ई-रिक्षाचालकांमुळे सेवा देण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. ही बाब लक्षात घेऊन माथेरान नगरपरिषद कोणती कार्यवाही करणार? याकडे सर्वसामान्य लोकांचे लक्ष लागले आहे. माथेरान शहारत रूग्णवाहिका असून देखील ई-रिक्षांचा वापर रुग्णसेवेसाठी होत असल्याचे दिसून आले असून त्याचा फटका प्रवासी वाहतुकीला होत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.






