Maharashtra News: पावसाने पाठ फिरवताच शेवगावात शेतकऱ्यांवर संकट! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
पोपट पिटेकर, शेवगाव: शेवगाव तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामावर पावसाचा मोठा परिणाम झाला आहे. जून अखेरपर्यंत पावसाने शेतकऱ्यांना चांगली साथ दिली. त्यामुळेच त्यांनी पेरण्या केल्या. त्यानंतर मात्र पावसाने बराच काळ पाठ फिरवल्याने शेतातील पिके अडचणीत आली आहेत. शेतामध्ये जमिनीला भेग्या पडू लागल्या, तसेच विहिर आणि तलाव देखील कोरडे पडू लागेल
तालुक्यात खरीप पिकांसाठी सुमारे ६५ हजार ११७ हेक्टर क्षेत्र निश्चित करण्यात आले होते. यापैंकी जवळपास ९९ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली. सोयाबीन, कपाशी, बाजरी, मका, तूर, मूग आणि उडीद अशी विविध पिके शेतात उभी राहिली. सुरुवातीला पिकांची स्थिती चांगली असल्याने शेतकऱ्यांना यंदाचा हंगाम समाधानकारक जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र पावसाने दडी मारल्याने ही आशा आता मावळताना दिसत आहे.
सोयाबीनची पाने सुकू लागली असून कपाशीच्या वाढीवर देखील परिणाम दिसून लागला आहे. बाजरी आणि मक्याची पिके पाण्याअभावी वाकू लागली आहेत. तुरीसह चारा पिकांनाही मोठा फटका बसला आहे. काही शेतांमध्ये पीक वाचवण्यासाठी पाणी देण्याची गरज आहे; पण त्यासाठी आवश्यक पाणीच उपलब्ध नसल्याची परिस्थिती आहे.
शेतकरी गोवर्धन वाघमारे यांच्याकडे साडेतीन एकर शेती आहे. त्यांनी सोयाबीन, कपाशी आणि चारा पिकांची लागवड केली. बियाणे, खत, औषध, मशागत आणि मजुरीसाठी खर्च केल्यानंतर आता पिके वाचवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. पाऊस न झाल्याने मोठे नुकसान होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली असून सरकारने तातडीने मदत करावी, अशी मागणी केली आहे. Maharashtra News:
महादेव गोलार यांची पाच एकर शेती आहे. त्यांच्या शेतात बाजरी, कपाशी, ऊस आणि चाऱ्याची पिके आहेत. मात्र पावसाअभावी चारा पिकेही संकटात आली आहेत. त्यामुळे शेतातील नुकसानाबरोबरच जनावरांना खाऊ घालायचे कसे, हा प्रश्न त्यांच्या कुटुंबासमोर उभा राहिला आहे. पिकांचे नुकसान झाले की त्याचा परिणाम थेट शेतकऱ्याच्या घरावर होतो. उत्पन्न घटते, कर्जाची चिंता वाढते आणि पुढील हंगामासाठी पैसे उभे करणे कठीण होते. त्यामुळे सध्याची परिस्थिती केवळ शेतीपुरती मर्यादित नसून गावातील बाजारपेठेवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
Dombivli News: संस्कारांचा वारसा जतनासाठी डोंबिवलीत उपकर्म उत्सव; २०० ब्राह्मण कुटुंबांचा सहभाग
शेतकऱ्यांकडून आता केवळ आश्वासनांऐवजी प्रत्यक्ष मदतीची मागणी होत आहे. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे, नुकसानभरपाई, जनावरांसाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था याबाबत तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे यांनीही शासनाने परिस्थितीची दखल न घेतल्यास १ सप्टेंबर रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
बांधकाम परवानगीसोबतच होणार जमिनीचा NA; कार्यालयांच्या फेऱ्या आता वाचणार
आज शेवगावच्या शेतकऱ्यांसाठी आभाळाकडे पाहण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. पाऊस कधी येईल याची खात्री नाही आणि हातातील पीक दिवसेंदिवस सुकत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा प्रश्न आता केवळ पावसाचा राहिलेला नसून शेती, जनावरे आणि कुटुंबाचा संसार कसा टिकवायचा, याचा झाला आहे.






