
Raigad News: जमीन दिली पण पैसे नाहीत! मुरुड-जंजिरा पुलाचे काम ठप्प; शेतकऱ्यांना मोबदला न मिळाल्याने आंदोलन
या पुलाच्या बांधकामासाठी शेतकरी वर्गास त्यांनी जमिनी देऊन सुद्धा मोबदला दिला गेला नाही, हे मुख्य कारण आहे. मुरुड तालुक्यामधील सावली व टोकेखार भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी या पुलासाठी गेलेल्या आहेत. सुरुवातीला चांगाला मोबदला मिळेल म्हणून अमिष दाखवण्यात आले होते. परंतु पुलाचे बांधकाम होऊन सुद्धा अद्यापपर्यंत शेतकरी वर्गाच्या जमिनीचे पैसे मात्र प्राप्त न झाल्याने अखेर येथील स्थानिक शेतकरी एकवटले व या भागात सुरू असलेले काम अखेर बंद करण्यात आले आहे.
पुलाच्या कामासाठी येथील स्थानिक शेतकरी वर्गाने आपल्या जमिनी दिल्या आहेत. जमिनी दिल्यावर महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने शेतकरी वर्गाला पैसे देणे अनिवार्य होते. आज येतील, उद्या पैसे देतील अशी अनेक दिवस प्रतीक्षा करून सुद्धा शेतकरी वर्गास पैसे प्राप्त न झाल्याने अखेर सर्वांनी काम बंद पाडण्याचा निर्णय घेतला. – शाम कोतवाल, स्थानिक शेतकरी
पुलाचे काम बंद होऊन अनेक दिवस जाऊन सुद्धा शेतकरी वर्गास जमिनीचे पैसे प्राप्त झालेले नाहीत. वाबाचत येथील स्थानिक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करून जोपर्यंत जमिनीचे पैसे प्राप्त होत नाही, तोपर्यंत आम्ही येथील काम करू देणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे येथील भागातील पुलाचे हे काम गेले अनेक दिवस बंद आहे.
याबाबत दै. ‘नवराष्ट्र’ च्या प्रतिनिधीने रस्ते विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी संजय गोरे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, “सावली व टोकेखार येथील शेतकरी वर्गाची मीटिंग घेण्यात येऊन त्यांच्या समस्या ऐकण्यात येऊन त्यावर योग्य तोडगा सुद्धा काढण्यात आला आहे. मे महिन्यात सर्व शेतकरी वर्गाला त्यांच्या जमिनीचे पैसे त्यांना देण्यात येणार आहेत. पुलाचे काम काही दिवस बंद होते.” आता शेतकऱ्यांशी चर्चा केल्यावर हे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली आहे.