
Raigad News: पहिल्याच पावसात घरे जलमय होण्याची भीती! नेरळमध्ये बिल्डरविरोधात ग्रामस्थ आक्रमक
मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग; अर्थ किंवा महसूल खात्यासाठी वळसे पाटील यांचे नाव चर्चेत
कर्जत-नेरळ कल्याण या राज्यमार्ग रस्त्याने येणारा नाला ममदापूर ग्रामपंचायतमधील खांडा भागातून जातो. येथील नैसर्गिक नाला ‘अलायन्स ग्रुप’ या कंपनीच्या बिल्डरकडून आपल्या जमिनीत केलेल्या मातीच्या भरावामुळे बंद झाला आहे. संबंधित बिल्डरने गृहप्रकल्पाच्या बांधकामासाठी केलेल्या मातीच्या भरावाचा परिणाम होऊन त्या भागात राहणारे स्थानिक लोकांच्या दारातून जाणारा नाला बंद होणार आहे. या मनमानी कारभारामुळे आगामी पावसाळ्यात नेरल खांडा येथील अचानक नगरमधील नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणावर वित्तहानी व जीवितहानी होण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली आहे. या समस्येच्या विरोधात येथील स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
नैसर्गिक गटांरातून वाहून जाणारे पाणी जाण्यासाठी बिल्डरने कोणतीही पर्यायी व्यवस्था केलेली नाही. यामुळे पहिल्याच पावसात डोंगर आणि उंचावरून येणारे पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरून घरांचे अतोनात नुकसान होऊ शकते, अशी तीव्र भीती रहिवाशांनी व्यक्त केली आहे. या बिल्डरच्या दादागिरीविरोधात कायदेशीर लढा देण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेत निवेदनातून संबंधितांवर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
या संदर्भात अचानक नगर येथील रहिवाशी यांनी एकत्र येत आवाज उठवला आहे. ग्रामस्थांनी कर्जत तहसीलदार आणि गटविकास अधिकारी आणि नेरळ विकास प्राधिकरण यांच्याकडे पत्राद्वारे लेखी तक्रारी दाखल केल्या आहेत. काही दिवसांवर आलेले पावसाळ्यापूर्वी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून हा नाला पूर्ववत केला नाही किंवा पाण्याचा निचरा होण्यासाठी सक्षम पर्यायी व्यवस्था करून दिली नाही, तर नेरळ खाडा येथील अचानक नगरमधील सर्व नागरिक तीव्र आंदोलन छेडतील, ज्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासन व संबंधित बिल्डरवर असेल, असा इशाराही देण्यात आला आहे.