संग्रहित फोटो
रांजणी /रमेश जाधव : राज्यातील महायुती सरकारच्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना पुन्हा वेग आला असून, त्यानिमित्ताने विविध खात्यांच्या वाटपाबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अर्थ किंवा महसूल यापैकी महत्त्वाचे खाते मिळाल्यास त्या खात्याची धुरा कोणाच्या हाती दिली जाणार, याबाबत चर्चा रंगू लागली आहे.
राजकीय निरीक्षकांच्या मते, राज्याचे उपमुख्यमंत्री( स्व) अजित दादा पवार यांच्याकडे असलेले अर्थ खाते सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. अर्थसंकल्पीय प्रक्रिया आणि प्रशासकीय कारणांमुळे हे खाते तात्पुरत्या स्वरूपात मुख्यमंत्र्यांकडे देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आगामी काळात खातेवाटपाच्या फेरबदलात अर्थ खाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यता काही जाणकार व्यक्त करीत आहेत.
दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून पक्षाला महत्त्वाचे खाते मिळावे यासाठी विविध स्तरांवर चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, खासदार पार्थ पवार यांच्यासह अन्य नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
अर्थ खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे आल्यास त्या खात्यासाठी राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे नाव प्रमुख दावेदार म्हणून चर्चेत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. प्रशासनातील प्रदीर्घ अनुभव, विविध खात्यांमधील कामकाजाची सखोल जाण, तसेच महायुतीतील घटक पक्षांशी असलेला समन्वय यामुळे ते या जबाबदारीसाठी योग्य ठरू शकतात, असे मत काही जाणकार व्यक्त करीत आहेत.
राजकीय कारकिर्दीत दिलीप वळसे पाटील यांनी उच्च तंत्र शिक्षण, ऊर्जा, वैद्यकीय शिक्षण, अर्थ,कामगार, उत्पादन शुल्क, सहकार, गृह तसेच विधानसभा अध्यक्ष यांसारख्या विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. विशेषतः राज्यात वीजटंचाईचे संकट असताना ऊर्जा खात्याची धुरा सांभाळत त्यांनी घेतलेल्या निर्णयांची आजही राजकीय क्षेत्रात चर्चा होत असल्याचे निरीक्षक सांगतात.
सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील अनेक नेत्यांशी सलोख्याचे संबंध, अभ्यासू वृत्ती, पारदर्शक कार्यपद्धती आणि प्रशासकीय अनुभव ही त्यांची जमेची बाजू मानली जाते. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थ किंवा महसूल यापैकी कोणतेही महत्त्वाचे खाते मिळाल्यास त्याची जबाबदारी दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सोपविली जाऊ शकते, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आणि विधिमंडळ सदस्यांमध्ये सुरू असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान विश्वसनी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अर्थ खात्याऐवजी महसूल खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे देण्याच्या हालचाली भाजपच्या गोटात सुरू आहेत. जर तसे झाल्यास चंद्रशेखर बावनकुळे यांना पुन्हा ऊर्जा खाते मिळू शकते कारण यापूर्वी बावनकुळे यांनी ऊर्जा खात्याचा कारभार योग्य पद्धतीने हाताळला असून, त्यांना ऊर्जा खात्याचा चांगला अनुभव आहे. मात्र मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप आणि मंत्रिपदांची जबाबदारी याबाबतचा अंतिम निर्णय महायुतीचे वरिष्ठ नेतृत्व घेणार असून अधिकृत घोषणा होईपर्यंत या सर्व चर्चा केवळ राजकीय शक्यता आणि अंदाज म्हणूनच पाहिल्या जात आहेत.






