कांजूर डम्पिंग; विषारी विळखा! पालिकेच्या निष्क्रियतेबाबत नाराजी; जागतिक प्रदूषणात १२ व्या स्थानावर
मुंबईतील कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडनमुळे आता जागतिक स्तरावरही मुंबईची बदनामी झाल्याची नोंद समोर आली आहे. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, लॉस एंजेलिस यांच्या २०२६ च्या स्टॉप मिथेन प्रोजेक्ट अहवालानुसार कांजूरमार्ग लँडफिलला जगातील सर्वाधिक प्रदूषित लैंडफिल्समध्ये १२वा क्रमांक मिळाला आहे. दर तासाला तब्बल ४.९ टन मिथेन वायूची गळती होत असल्याचे या अहवालात स्पष्ट झाले असून, हे प्रदूषण जवळपास दहा लाख एस एसयुव्ही वाहनांच्या प्रदूषणाइतके धोकादायक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. इतक्या गंभीर परिस्थितीनंतरही मुंबई महापालिका आणि राज्य सरकार केवळ आश्वासनांची धूळफेक करत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कांजूर डम्पिंग ग्राऊंडमुळे कांजूरमार्ग, भांडुप, मुलुंड, विक्रोळी परिसरातील लाखो नागरिकांचे जीवन नरकयातना बनले आहे.(फोटो सौजन्य – AI)
इराण-अमेरिका युद्धाचा सर्वसामान्यांवर होतोय परिणाम; इंधनाच्या दरानंतर आता खाद्यतेलाचे दरही वाढले
मुंबईतील जवळपास ९० टक्के घनकचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या या कचराभूमीबाबत पालिका प्रशासनाची भूमिका मात्र पूर्णपणे बेजबाबदार असल्याचा आरोप होत आहे. उपाययोजना सुरू आहेत, वृक्षलागवड केली जाईल, पर्यायी जागेचा शोध सुरू आहे, अशी केवळ कागदी घोषणा करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. प्रत्यक्षात परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालली आहे. १८५ लाख मेट्रिक टनांहून अधिक जुना कचरा या परिसरात साचलेला असून, त्यातून निर्माण होणारे मिथेन उत्सर्जन थांबविण्यासाठी कोणतीही ठोस व प्रभावी कृती करण्यात आलेली नाही.
दुर्गंधी, प्रदूषित हवा, वारंवार लागणाऱ्या आगी व मिथेन वायूच्या वाढत्या प्रमाणामुळे नागरिकांना श्वसनाचे विकार, त्वचारोग, फुफ्फुसांचे आजार, दमा, एलर्जी यांसारख्या गंभीर आजारांनी ग्रासले आहे. विशेषतः लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य सर्वाधिक धोक्यात आले आहे.अनेक नागरिकांचे आयुष्य कमी होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी हा मुद्दा सातत्याने मांडला असून पालिका आयुक्तांसोबतच्या बैठका, डीपीडीसी बैठका तसेच दिल्लीतील लोकसभेतही त्यांनी ईशान्य मुंबईतील डम्पिंगमुळे नागरिकांच्या आरोग्यावर होत असलेल्या गंभीर परिणामांचा मुद्दा वारंवार उपस्थित केला आहे. याबाबत त्यांनी अनेकदा पत्रव्यवहार करून प्रशासनाला धारेवर धरले आहे. मुंबईकरांच्या जीवाशी खेळ थांबवा, कांजूर डम्पिंगला पर्याय द्या, अशी ठाम भूमिका घेण्यात आली आहे.






