संग्रहित फोटो
इचलकरंजी : राज्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांची २३४९ कोटी रूपयाची एफआरपी थकीत असल्याची चुकीची आकडेवारी असून, राज्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांची जवळपास ७ हजार कोटी रूपयाचे एफआरपी थकीत आहे. यामुळे संबधित साखर कारखान्यांवर आरआरसी अंतर्गत कारवाई करून तातडीने उसबिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्याचे साखर आयुक्त सिध्दराम सालीमठ यांच्याकडे केली.
उस उत्पादक शेतकऱ्यांना एक रक्कमी एफआरपी देण्याबाबत मागील आठवड्यात उच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर राज्यातील थकीत एफआरपीबाबत शेट्टी यांनी मंगळवारी पुणे येथे साखर आयुक्त यांची भेट घेतली. यावेळी थकीत एफआरपी बरोबरच काटामारी, रिकव्हरी चोरी, वजनकाटे ॲानलाइन करणे, तोडणी वाहतुकीचा खर्च अंतरावर निर्देशात करण्यात यावा, थकीत एफआरपी १५ टक्के व्याजासह वसूल करण्यात यावे, राज्यातील साखर कारखान्यांचे शासकीय लेखा परिक्षकाकडून लेखा परिक्षण करण्यात यावे, यासह विविध मुद्यावर चर्चा करण्यात आली.
राज्यातील काही मोजके राज्यकर्तेच साखर उद्योगात वर्चस्व निर्माण करून साखर उद्योगात एकाधिकारशाही निर्माण करत आहेत, असा आरोप करून शेट्टी म्हणाले, मुठभर कारखानदार साखर उद्योगाची सुत्रे स्वत:च्या हातात ठेवून चुकीचे कायदे करून उस उत्पादक शेतकऱ्यांचे शोषण करत आहेत. वास्तविक पाहता साखरेसह उपपदार्थांना बाजारात चांगला दर मिळू लागला आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना एक रक्कमी एफआरपी देणे सहज शक्य आहे. मात्र साखर कारखानदार प्रक्रिया खर्च वाढल्याचे कारण सांगत दोन किंवा तीन टप्यात एफआरपी देण्याचा घाट घालत आहेत.
कारखान्यांच्या अर्थकारणावर परिणाम पाहता उसाचे क्षेत्र मर्यादित असल्याने अंतराची अट टाकून नवीन साखर कारखान्यांना शासनाकडून मान्यता देणे बंद आहे. मात्र दुसरीकडे तीन हजार व पाच हजार गाळप असणारे कारखान्यांनी सध्या १८ ते २० हजार टनांनी गाळप क्षमता वाढवून गाळप सुरू केले आहेत. यामुळे साखर कारखान्यांचा गाळप हंगामाचे दिवस कमी झाले असून, याचा अनिष्ठ परिणाम कारखान्यांच्या अर्थकारणावर झाला आहे, असे शेट्टी यांनी नमूद केले.
कारवाई न केल्यास धडक मोर्चा काढणार
येत्या आठ दिवसात साखर आयुक्तांनी राज्यातील सर्व उस उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत ७ हजार कोटी रूपये १५ टक्के व्याजासह देण्यासंदर्भात साखर कारखान्यांवर आरआरसी अंतर्गत कारवाई न केल्यास साखर आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढणार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला. यावेळी राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, ॲड. योगेश पांडे, पुणे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.