
खाडीपट्टय़ातील असंख्य गावांना जोडणाऱ्या कोंढे-करंबवणे मार्गावरील खोपड-कालुस्ते नदीवरील लहान पूल अलिकडच्या काळात कमकुवत झाला होता. त्यामुळे आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून या पुलासाठी कोटीहून अधिकचा निधी मंजूर झाला. या पुलाच्या ठेकेदाराला 23 सप्टेंबर 2025 रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला होता. संबंधित ठेकेदाराने पुलाचे मुख्य बांधकाम वेळेत पूर्ण केल्याचे सांगितले असले, तरी पोच मार्गाचे आवश्यक खडीकरण व डांबरीकरण आजतागायत करण्यात आलेले नाही. गतवर्षी पावसाळा संपल्यानंतर काम सुरू करण्याचे आश्वासन देऊनही ठेकेदाराने दखल घेतली नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
याबाबत कालुस्ते बुद्रुक ग्रामपंचायतीने 8 जानेवारी 2026 रोजी लेखी पत्राद्वारे रोजगार हमी योजना कार्यालयाकडे तक्रार नोंदवली आहे. तसेच स्थानिक ग्रामस्थांनी उपविभागीय कार्यालयाकडे वारंवार पाठपुरावा करून अपघाताची शक्यता व्यक्त केली आहे. रस्त्याची दयनीय अवस्था आणि अपूर्ण पोच मार्गामुळे वाहनचालकांना मोठा धोका निर्माण झाला असून पावसाळय़ापूर्वी काम पूर्ण न झाल्यास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, उपविभागीय अधिकारी रोहयो उपविभाग चिपळूण यांच्या वतीने ठेकेदारास तातडीचे पत्र पाठवून उर्वरित काम त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अन्यथा निविदेच्या अटी-शर्तींनुसार पुढील कार्यवाहीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. मात्र सदर ठेकेदाराने त्या पत्रालाही केरी टोपली दाखवली. दरम्यान, प्रशासनाच्या वारंवार सूचनांकडे ठेकेदार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी आता 1 मे रोजी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
आमचा संयम संपत चालला आहे. अपघात झाल्यानंतर प्रशासन जागे होणार का? असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. खाडीपट्टय़ातील या महत्त्वाच्या मार्गावरील पूल पूर्णत्वास जाऊनही पोच मार्ग अपूर्ण राहिल्याने विकासकामांतील हलगर्जीपणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. एकीकडे हा सगळा प्रकार तर दुसरीकडे तालुक्यातील पाली-निरबाडे, मुसाड- कुरवळ खेड, कुरवळ जावळी (ता. खेड) या मुख्य रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. हा रस्ता वाहतुकी योग्य करण्यात यावा, अशी मागणी येथील मुसाड ग्रामस्थांनी केली असून अन्यथा २८ एप्रिल पासून उपोषण करू, असा इशारा येथील मुसाड ग्रामस्थांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
पाली- निरबाडे, मुसाड- कुरवळ खेड, कुरवळ जावळी हा मुख्य रस्ता अनेक गावांना जोडणारा असल्याने ग्रामस्थ, शाळकरी विद्यार्थी, रुग्णवाहिका तसेच इतर अत्यावश्यक सेवा या रस्त्यावरून सतत ये -जा करीत असतात. या रस्त्याची दुरावस्था असल्याने अपघाताचे प्रमाण देखील वाढलेले आहे. विशेषत: पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनते. यासंदर्भात प्रशासनाकडे अनेक वेळा पत्र व्यवहार करण्यात आला. मात्र, अद्याप तितकीशी दखल घेतली गेलेली नाही. यामुळे वाहन चालकांना खड्ड्यातूनच आपली वाहने चालवावी लागत आहेत. तरी या मार्गावरील खड्डे बुजवणे तसेच आवश्यक ती दुरुस्तीची कामे तातडीने करण्यात यावीत, अशी मागणी मुसाड ग्रामस्थांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. अन्यथा 28 एप्रिल रोजी उपोषण छेडू, असा इशारा देखील या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.