
लोटे प्रदूषणात घट अन् खाडीत जीवसृष्टीची चाहूल; कोळंबी-खेकड्यांच्या पुनरागमनाने मच्छीमार सुखावले
चिपळूण, गुहागर, खेड आणि दापोली या चार तालुक्यांमध्ये विस्तारलेल्या सुमारे ४० किलोमीटर लांबीच्या करंबवणे खाडीवर हजारो मच्छीमारांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. एकेकाळी रावस, पापलेट, रेणवी, कोळंबी, टोळके आणि खेकडे यांसारख्या दर्जेदार मासळीची रेलचेल असलेल्या या खाडीला १९९७ मध्ये लोटे औद्योगिक वसाहतीतून झालेल्या रासायनिक प्रदूषणाचा मोठा फटका बसला होता. त्यानंतर अनेक वर्षे खाडीतील मत्स्यसंपदा आणि स्थानिकांचे जीवनमान यावर गंभीर परिणाम झाला.
Redi Ganpati: कोकणातील दोन भुजा असलेला रेडीचा गणपती, काय आहेत या मूर्तीची वैशिष्ट्ये जाणून घ्या
मात्र गेल्या काही वर्षांत सीईटीपीमध्ये करण्यात आलेल्या सुधारणा, विस्तारीकरण आणि प्रदूषण नियंत्रणासाठी उचललेल्या उपाययोजनांमुळे परिस्थितीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. सीईटीपीचे अध्यक्ष सतीश वाघ यांच्या नेतृत्वाखाली प्रदूषण नियंत्रणासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे खाडीत जाणाऱ्या सांडपाण्याचे प्रमाण आणि त्याचा परिणाम कमी झाल्याचे दिसून येत आहे. याशिवाय, खाडीत जाणारी सांडपाणी वाहून नेणारी पाईपलाईन अनेक ठिकाणी गळतीमुळे खराब झाली होती. त्यामुळे एमआयडीसीने सुमारे तीन किलोमीटर लांबीची नवीन पाईपलाईन टाकली असून आणखी विस्ताराचे काम सुरू आहे. परिणामी, यंदा प्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणावर मासे मृतावस्थेत आढळण्याच्या घटना जवळपास घडलेल्या नाहीत.
सध्या करंबवणे, केतकी, भिले परिसरातील आतील भागात खेकडे आणि मिळत आहेत. मालदोलच्या खालच्या भागात बारीक कोलीमही जाळ्यांमध्ये सापडत आहे. मोठी कोळंबी चिपळूण बाजारात तब्बल हजार रुपये किलो दराने विकली जात असून लहान कोळंबीला ४०० ते ५०० रुपये किलो भाव मिळत आहे. त्यामुळे मच्छीमारांच्या उत्पन्नातही वाढ होत आहे. मात्र खेड तालुक्यातील जगबुडी नदीच्या परिसरात मासळीचे प्रमाण अद्याप पूर्वीसारखे झालेले नसल्याचे स्थानिक मच्छीमार सांगतात. तरीही संपूर्ण खाडी परिसरातील परिस्थिती पूर्वीपेक्षा खूपच सुधारल्याचे चित्र आहे.
“खाडीत सध्या विविध प्रकारची मासळी, कोळंबी, खेकडे आणि कोलीम मिळत आहेत, ही सकारात्मक बाब आहे. मात्र जगबुडी परिसरात मासळीचे प्रमाण अजूनही कमी आहे. काही कारखान्यांकडून अजूनही चोरट्या मार्गाने नाल्यांमधून सांडपाणी सोडले जाते. त्याला पूर्णपणे आळा बसला तर करंबवणे खाडी पुन्हा पूर्वीच्या वैभवाने मासळीने बहरून जाईल,” असे मत दाभोळखाडी परिसर संघर्ष समितीचे संजय जुवळे यांनी व्यक्त केले.