
कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने
कोकणकन्या एक्सप्रेसच्या विलंबाचा थेट परिणाम मुंबईहून मडगावकडे जाणाऱ्या १०१०३ मुंबई–मडगाव मांडवी एक्सप्रेसवर झाला. ही गाडीही सहा तासांहून अधिक उशिराने धावत असल्याने मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा या मार्गावरील हजारो प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अनेक प्रवाशांच्या पुढील प्रवासाचे नियोजनही विस्कळीत झाले.
याशिवाय, स्वतंत्र तांत्रिक कारणामुळे १०१०४ मडगाव–मुंबई मांडवी एक्सप्रेसही किमान अडीच तास उशिराने धावत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दोन्ही दिशांमधील रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून कोकण रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे बिघडल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे, या विलंबामागे मुसळधार पाऊस, दरड कोसळणे किंवा इतर नैसर्गिक अडथळे कारणीभूत नसून तांत्रिक आणि मानवनिर्मित कारणांमुळे रेल्वे वाहतूक प्रभावित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण असून रेल्वे प्रशासनाकडून अधिक प्रभावी नियोजनाची मागणी होत आहे.
रेल्वे अभ्यासकांच्या मते, कोकण रेल्वेने पुरेशी क्षमता आणि वेळेचे नियोजन नसतानाही कोकणकन्या एक्सप्रेसला सुपरफास्टचा दर्जा दिल्यामुळे वेळापत्रकावर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे कोकणकन्या आणि मांडवी या दोन्ही महत्त्वाच्या गाड्यांवर त्याचा परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर कोकणकन्या एक्सप्रेसचा सुपरफास्ट दर्जा रद्द करणे किंवा मडगावहून मुंबईकडे येणारी कोकणकन्या एक्सप्रेस किमान एक तास लवकर सोडणे, हेच तातडीचे उपाय असल्याची मागणी प्रवासी आणि रेल्वे जाणकारांकडून केली जात आहे. रेल्वे प्रशासनाने याबाबत त्वरित निर्णय घेऊन कोकण रेल्वेचे वेळापत्रक सुरळीत करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील मर्यादित क्षमता आणि वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता वेळापत्रकाचे काटेकोर नियोजन आवश्यक आहे. मात्र, पुरेशी क्षमता आणि वेळेचे नियोजन नसतानाही कोकणकन्या एक्सप्रेसला सुपरफास्टचा दर्जा देण्यात आल्याने वेळापत्रकावर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. परिणामी कोकणकन्या आणि मांडवीसारख्या महत्त्वाच्या गाड्यांमध्ये वारंवार विलंब होत असल्याचे ते सांगतात. सध्या तांत्रिक बिघाड दूर करण्याचे काम पूर्ण झाले असले तरी दिवसभर अनेक गाड्यांच्या वेळापत्रकावर त्याचा परिणाम कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी आपल्या गाडीची अद्ययावत स्थिती तपासूनच रेल्वे स्थानकावर जाण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
Kokan Railway: कोकणवासियांसाठी खुशखबर! ‘या’ गाड्यांना कणकवली,सिंधुदुर्गात मिळणार थांबा