
रत्नागिरी जिल्ह्याला उद्या रेड अलर्ट (Photo Credit- AI)
हवामान विभागाने जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून, अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. या आदेशानुसार सर्व अंगणवाड्या, सरकारी व खासगी प्राथमिक-माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद व नगरपालिका शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये तसेच व्यवसाय व प्रशिक्षण केंद्रांशी संबंधित सर्व शैक्षणिक संस्था बंद राहणार आहेत.
दरम्यान, नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर अनावश्यक प्रवास टाळावा, पूरग्रस्त व धोकादायक ठिकाणांपासून दूर राहावे तसेच प्रशासनाने वेळोवेळी जारी केलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत असून अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर नाशिकमधील महत्त्वाची पर्यटन स्थळे बंद करण्यात येणार आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर देवस्थान, सप्तश्रृंगी देवस्थान तसेच दुगारवाडी धबधबा, हरिहर गडसह सर्व पर्यटनस्थळे पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) मंगळवार, 7 जुलै रोजी नाशिक जिल्ह्यासाठी हाय अलर्ट जारी केला असून, नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसरात ढगफुटीसदृश अतिवृष्टी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने व्यापक खबरदारीचे उपाय हाती घेतले आहेत.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, नाशिक आणि त्र्यंबकेश्वरदरम्यान काही भागांत सुमारे 300 मिमीपर्यंत पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यंत सतर्क राहावे आणि अनावश्यक प्रवास टाळावा.
सुरक्षेच्या दृष्टीने नाशिक जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे मंगळवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार दुगारवाडी धबधबा, हरिहर गड तसेच इतर लोकप्रिय पर्यटनस्थळांवर पर्यटकांना प्रवेश दिला जाणार नाही. ही बंदी पुढील आदेशापर्यंत कायम राहू शकते. तसेच, त्र्यंबकेश्वर मंदिर मंगळवारी भाविकांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. भाविकांनी मंदिरात येणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. सप्तशृंगी देवस्थान देखील अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे बंद ठेवण्यात येणार असून, यात्रेकरूंनी प्रवास पुढे ढकलण्याचा सल्ला देण्यात आला आहे.