सातारा जिल्ह्यात पावसाचे थैमान! महाबळेश्वरमध्ये १०० वर्षांतील विक्रमी ११ इंच पाऊस (Photo Credit- X)
पावसाच्या गंभीर परिस्थितीची दखल घेत पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हा प्रशासनाचा तातडीचा आढावा घेतला. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत एनडीआरएफसह सर्व आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले.
बैठकीस जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभय काटकर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महाबळेश्वर, पाटण, कोयनानगर, नवजा, आठवली, बामणेवाडी आदी अतिसंवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.
दरम्यान, सडा वाघापूर, ओझर्डे, लिंगमळा, ठोसेघर आणि महाबळेश्वर येथील एलफिन्स्टन पॉइंट परिसरात चिखल आणि घसरडा रस्ता निर्माण झाल्याने पर्यटकांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
सातारा शहरात दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे राजवाडा, पोवई नाका आणि भाजी मंडई परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरले. व्यापारी आणि शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून रेनकोट, छत्र्या आणि छत्री दुरुस्तीच्या दुकानांवर नागरिकांची गर्दी वाढली आहे.
दुसरीकडे, ठोसेघर, भांबवली, कास आणि महाबळेश्वर परिसरातील धबधबे दुथडी भरून वाहत असल्याने पर्यटकांचा ओढा वाढत असला, तरी प्रशासनाने अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
सुरक्षिततेच्या कारणास्तव सातारा, पाटण, महाबळेश्वर, वाई आणि जावळी या पाच तालुक्यांतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ५२.७ मिमी पावसाची नोंद झाली असून महाबळेश्वरमध्ये २८६ मिमी (सुमारे ११ इंच) पाऊस पडला आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ४८ तासांत ४.११ टीएमसी पाण्याची भर पडल्याने धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याचे आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.






