मुसळधार पाऊस आणि डोंगराळ भागाचे आव्हान पेलत महावितरणचे यश; प्रभावित गावांमध्ये वीजपुरवठा पूर्ववत
दस्तुरी–मंडणगड ३३ केव्ही वीजवाहिनीवर भूस्खलनामुळे काही वीजखांब कोसळले. त्याचवेळी दस्तुरी–विसापूर ३३ केव्ही वीजवाहिनीवर घनदाट जंगलात मोठे झाड कोसळल्याने दोन्ही मुख्य वीजवाहिन्यांमध्ये गंभीर बिघाड झाला. परिणामी मंडणगड आणि दापोली तालुक्यातील अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला.
घटनेची माहिती मिळताच महावितरणची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. दस्तुरी–विसापूर वीजवाहिनी घनदाट जंगल आणि डोंगराळ भागातून जात असल्याने मुसळधार पावसात कर्मचारी पायी चालत पेट्रोलिंग करत बिघाडाचे ठिकाण शोधण्यासाठी गेले. प्रतिकूल हवामान, चिखल आणि निसरड्या वाटांवरून मार्ग काढत त्यांनी वीजवाहिनी दुरुस्त केली आणि पुरवठा सुरू केला.
दस्तुरी–मंडणगड वीजवाहिनीवरील भूस्खलनामुळे कोसळलेले वीजखांब बदलण्याचे कामही तातडीने सुरू करण्यात आले. कार्यकारी अभियंता (खेड) आणि उपकार्यकारी अभियंता (मंडणगड विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले.
अभियंते, कर्मचारी आणि कंत्राटदारांनी समन्वयाने काम करत नवीन वीजखांब उभारले आणि वीजवाहिनी पूर्ववत केली. त्यामुळे सायंकाळपर्यंत मंडणगड तालुका आणि दापोलीतील प्रभावित गावांमध्ये वीजपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात आला.
दरम्यान, त्याच दिवशी सायंकाळी मंडणगड–केरीळ ३३ केव्ही वीजवाहिनीमध्येही जंगल परिसरात बिघाड झाला. बाणकोट आणि देव्हारे शाखेतील कर्मचाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत मुसळधार पावसात काम करत हा बिघाडही दूर केला. त्यामुळे किनारपट्टी भागातील वीजपुरवठाही रात्रीच पूर्ववत करण्यात आला.
या संपूर्ण आपत्कालीन कामकाजादरम्यान रत्नागिरी मंडळाचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव आणि रत्नागिरी परिमंडलाचे मुख्य अभियंता अनिल डोये यांनी सातत्याने परिस्थितीचा आढावा घेत आवश्यक मार्गदर्शन केले.
महावितरणच्या मंडणगड, कुंबळे, पालगड, बाणकोट, देव्हारे आणि केळशी शाखांतील अभियंते, कर्मचारी, कंत्राटदार तसेच स्थानिक सहकाऱ्यांच्या समन्वित प्रयत्नांमुळे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही अल्पावधीत वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यश आले. या कामगिरीमुळे प्रभावित भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.






