Review of Sant Dnyaneshwar Sant Tukaram Palkhi Ceremony 2025 by Pune District Magistrate
पुणे : आगामी आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी संस्थांनी तयारी करण्यास सुरुवात केली आहे. पालखी मार्गाची तपासणी केली जात आहे. त्याचबरोबर पाणी, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, रस्ते, रस्ता सुरक्षा, आरोग्य सुविधा आदी सर्व सोयी सुविधा योग्य पद्धतीने उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी आतापासूनच नियोजन करावे. वारकऱ्यांना कोणतीही असुविधा होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.
श्री क्षेत्र देहू व श्री क्षेत्र आळंदी ते पंढरपूर आषाढी वारी पालखी सोहळा नियोजनाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस उपायुक्त बापू बांगर, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीचे प्रमुख विश्वस्त अॅड. राजेंद्र उमाप, जगदुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे आदी उपस्थित होते. डुडी म्हणाले, श्री क्षेत्र आळंदी तसेच श्री क्षेत्र देहू संस्थानच्यावतीने करण्यात येणाऱ्या सूचनांवर सकारात्मक चर्चा करून तोडगा काढण्यात येईल. आरोग्य सुविधा, शौचालये, पाणीपुरवठा आदी सर्व सुविधा गतवर्षीपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येतील, अशी ग्वाहीही जितेंद्र डुडी यांनी दिली.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यावेळी आळंदी येथील दर्शनबारीच्या अनुषंगाने जमीन आरक्षण, पालखी मार्गस्थ असताना वाहतूक कोंडी होऊ नये, स्वागतासाठी लावण्यात येणारे ध्वनीक्षेपक, ध्वनीवर्धक, पालखी मार्गस्थ असताना तसेच पाण्याचे टैंकर भरण्याच्या ठिकाणी अखंड वीजपुरवठा, भारतीय राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणाने पालखी महामार्गाची अपूर्ण कामे करून घेणे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार क्षेत्रातील रस्त्यांची डागडुजी आदींच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. पालखी सोहळ्यात कोणत्याही घटनेच्या अनुषंगाने संपर्क साधण्यासाठी समन्वय अधिकारी म्हणून प्रांताधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यावर्षी आषाढी वारी सोहळ्यात मोठ्या प्रमाणात फिरती ई- टॉयलेट्स ठेवण्यात येणार आहेत. त्यांची स्वच्छता, तेथे पाण्याचा पुरवठा होत आहे किंवा कसे, आदी संनियंत्रण करण्याची वेगळी व्यवस्था व पथक नेमण्यात येणार आहे. त्याचे एक मोबाईल अॅप तयार करण्यात येणार असून, ही मोबाईल स्वच्छतागृहे ठेवण्यात आलेल्या ठिकाणी क्यू आर कोड लावण्यात येणार आहेत. ज्यावरुन अस्वच्छ स्वच्छतागृहांची छायाचित्रे काढून अपलोड करता येतील. ते प्रशासनास प्राप्त होतील व त्यानुसार स्वच्छतेबाबत नियोजन तात्काळ करणे शक्य होणार आहे. वेगवान मोबाईल नेटवर्कसाठी बूस्टर लावण्यात येतील, असेही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.