संदिपान भुमरे : जेव्हापासून शिवसेनेमध्ये बंडखोरी झाली आहे तेव्हपासून शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप काही थांबता थांबत नाहीये. त्यामुळे शिवसेनेमध्ये झालेल्या बंडखोरीला वर्ष उलटूनही या दोन्ही गटातील नेत्यांच्या आरोपाच्या फैरी मात्र अजूनही सुरूच आहे. याचदरम्यान शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा रोहयो मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. माध्यमांशी बोलताना संदिपान भुमरे म्हणाले, संजय राऊत टीव्हीवर दिसल्यास लोकं आता चॅनल बदलतात असा, टोला लगावला आहे.
पुढे ते म्हणाले, संजय राऊत काय बोलतो याला कुठलाही अर्थ नाही. सकाळी ९ वाजता टीव्ही सुरु केल्यास संजय राऊत काहीतरी बरळत असतात. त्यामुळे संजय राऊत काय बोलतोय याकडे लक्ष देण्याची गरज नाही. मागील बारा महिन्यात आम्ही ३६ सुधारित प्रशासकीय मान्यता (सुप्रमा) काढल्या. मागील सरकारच्या काळात फक्त एकच सुप्रमा काढण्यात आली होती. संजय राऊतला हे विचारलं पाहिजे तुम्ही, मागील सरकार काळात का नाही सुप्रमा काढल्या. फक्त विरोध करणे याशिवाय दुसरा कुठलाही संजय राऊतला काम नाही. सकाळी टीव्ही चालू केल्यावर त्या टीव्हीवर संजय राऊत दिसला तर लोकं चॅनल बदलू लागले आहेत, असेही भुमरे म्हणाले.
संजय राऊतची मुख्यमंत्रीच काय कोणीच धास्ती घेऊ शकत नाही. संजय राऊत पत्रकार म्हणून पत्रकार परिषदेत उपस्थित राहणार होते. मग का नाही आले. संजय राऊत यांना यायचं होते तर त्यांनी पत्रकार परिषदेत यायला हवे होते. त्यांना कोणी अडवलं. पत्रकारांना तर कोणी अडवत नाही. संजय राऊत फक्त देखावा करतो. काही विचारू शकत नाही. मराठा समाजाचे मूक मोर्चा निघत असतांना, या संजय राऊतने सामना वर्तमानपत्रांमध्ये काय छापले होते. तुम्हा सर्वांना माहित आहे. जेव्हा मूक मोर्चा निघत होते तेव्हा याच संजय राऊतने मुका मोर्चा म्हणून हेटाळणी केली होती हे समाज विसरला नाही. उद्धव साहेबांना खुश करण्यासाठी कुठेतरी संजय राऊतला हे नाटक करावे लागतात. खरोखरच संजय राऊतला पत्रकार म्हणून प्रश्न विचारायचे होते, तर त्यांनी पत्रकार परिषदेला येणे गरजेचे होतं. नुसतं वल्गना करून जमत नाही, असेही भुमरे म्हणाले.