
"शिवसेना भक्कम तरच महाराष्ट्रात हिंदू मजबूत...", संजय निरुपम यांचा निर्वाळा
निरुपम पुढे म्हणाले की, शिवसेना कमकुवत झाली तर उबाठा आणि काँग्रेसला फायदा होईल. महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना राज्यात साधुंची हत्या झाली होती. साधु संत सुरक्षित नव्हते त्यांचे झुंडबळी घेतले गेले. उबाठा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार एकत्र येतात तेव्हा हिंदु समाज आणि हिंदुत्व कमकुवत होते. हिंदू समाज आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी महाराष्ट्रात शिवसेना आणि एकनाथ शिंदे मजबूत राहणे आवश्यक आहे, असे मत निरुपम व्यक्त केले. शिवसेना कमकुवत करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे महाराष्ट्रात हिंदुत्व कमजोर करणे, असेही निरुपम म्हणाले.
नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या पहिल्या टप्प्यातील निडणुका मंगळवारी झाल्या. ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक होती, युतीची आवश्यकता नाही असे महायुतीतील नेत्यांचे मत होते. त्यामुळे कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी नगर परिषद आणि नगर पालिका निवडणुकीत बहुतांश ठिकाणी मित्र पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली. यावर महायुती संपली, युती तुटणार, असे फेक नरेटिव्ह विरोधकांनी पसरवले, मात्र महायुती अभेद्य आहे, असे निरुपम म्हणाले. निवडणूक संपली आता महायुती म्हणून सरकार काम करत आहेत, असे ते म्हणाले. शिवसेना पक्ष फुटीचा दावा करणाऱ्या उबाठा खासदार संजय राऊत यांच्याबाबत निरुपम म्हणाले की राऊत आजारी आहेत तरिही खोटं बोलत आहेत. खोटी बातमी पसरवून राज्यात खळबळ निर्माण करण्याचा प्रयत्न राऊत यांनी आता थांबवावा आणि आरोग्याची काळजी घ्यावी, असे निरुपम यांनी सांगितले.