
“गॅस बुकिंग केल्यानंतर अनेक दिवस प्रतीक्षा करावी लागते. एजन्सीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तरी प्रतिसाद मिळत नाही. वारंवार फेऱ्या मारूनही सिलेंडर मिळत नसल्याने घरगुती नियोजन कोलमडले आहे,” अशी तक्रार अनेक नागरिकांनी केली. काही महिलांनी तर “चुली पेटत नसल्याने मुलांच्या जेवणाचीही अडचण निर्माण झाली आहे,” अशी भावना व्यक्त केली.
नागरिकांच्या मते, गेल्या काही महिन्यांपासून पुरवठा विस्कळीत झाला असून, आखाती परिस्थितीनंतर ही समस्या अधिक गंभीर बनली आहे. मात्र, एजन्सीकडून याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात नसल्याचा आरोप करण्यात आला. सिलेंडर उपलब्ध नसल्याचे सांगितले जात असताना काही व्यावसायिकांकडे मात्र नियमित पुरवठा सुरू असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.
यामुळे घरगुती वापरासाठी असलेले सिलेंडर व्यावसायिकांकडे वळवले जात असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला.
“सामान्य ग्राहक रांगेत उभे राहतात, पण काही ठिकाणी सिलेंडर सहज पोहोचतात. यामागे नेमके काय सुरू आहे, याची चौकशी व्हावी,” अशी मागणी आंदोलकांनी केली. या प्रकरणाची दखल घेत जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी संबंधित नागरिकांचे निवेदन स्वीकारले. त्यांनी तातडीने विक्री व पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना चौकशीचे निर्देश दिले असून, संबंधित एजन्सीच्या वितरण व्यवस्थेची तपासणी केली जाणार असल्याचे सांगितले. “अनियमितता आढळल्यास आवश्यक ती कारवाई करण्यात येईल,” असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, वाढत्या तक्रारींमुळे शहरातील गॅस वितरण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, सामान्य नागरिकांना अत्यावश्यक सेवेसाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचे चित्र समोर आले आहे.