बॉयलर पेटवताना अचानक लागली आग
आदल्या दिवशी केमिकल बॉयलर चार्जिंगची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. सोमवारी सकाळी कंपनी सुरू करताना बॉयलर पेटवण्यात आल्यानंतर अचानक आग लागली. काही क्षणातच उच्च तापमानामुळे केमिकलने भरलेल्या बॅरल्सना स्फोट होऊ लागले. स्फोटांची तीव्रता इतकी होती की तब्बल ५ किलोमीटर अंतरावरूनही आवाज ऐकू येत होता. या स्फोटांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच तळबीड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे व उंब्रजचे पंकज पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली, तहसीलदार कल्पना ढवळे, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, डीवायएसपी राजश्री पाटील – यांनीही तत्काळ उपस्थित राहून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले.
यंत्रसामग्री, कच्चा माल व तयार माल जळून खाक
दरम्यान, कराड नगरपालिका, सहह्याद्री सहकारी साखर कारखाना, जयवंत शुगर तसेच अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यांचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले, अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांमुळे अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आणि मोठा अनर्थ टळला. या आगीत कंपनीतील यंत्रसामग्री, कच्चा माल आणि तयार माल जळून खाक झाला आहे. औद्योगिक वसाहतीत काही काळ भीतीचे वातावरण होते; मात्र वेळेवर कामगार बाहेर पडल्याने जीवितहानी टळली. दरम्यान, सुरक्षेच्या बाबतीत निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित मालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार असून संपूर्ण घटनेची सखोल चौकशी केली जाईल, असा इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांनी दिला आहे.
विशेष म्हणजे, सुमारे तीन वर्षांपूर्वी तासवडे एमआयडीसीतील उद्योगांच्या सुरक्षेबाबत गंभीर इशारे देण्यात आले होते. तत्कालीन खासदार श्रीनिवास पाटील यांनी घेतलेल्या बैठकीत औद्योगिक क्षेत्रात अग्निशमन यंत्रणा सक्षम करण्याच्या आणि प्रत्येक एमआयडीसीमध्ये स्वतंत्र अग्निशमन केंद्र सुरू करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या. पुणे जिल्ह्यातील आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्या सूचनांची अंमलबजावणी कितपत झाली, हा आत्ता मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. खराब वीजवाहिन्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात आले होते.






