
Satara News, Maharashtra Politics, Congress
Satara News: सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील (आप्पा) यांनी पत्रकार परिषदेत विधानसभा निवडणुकीतील मतदार यादीवर गंभीर आरोप केले. जिल्ह्यात सुमारे ५६ हजार दुबार मतदार असल्याचा दावा करत या संदर्भातील नोंदी आणि कागदपत्रे प्रशासनाकडे सादर केल्याची माहिती त्यांनी दिली. (Satara Congress Alleges 56,000 Duplicate Voters In District)
येथील काँग्रेस कमिटी मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते .यावेळी काँग्रेसचे एडवोकेट राजेंद्र शेलार व महिला आघाडीच्या सुषमा राजे घोरपडे उपस्थित होते .
पाटील यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी सुमारे ७ टक्क्यांनी वाढली असून त्यामागे दुबार मतदार आणि कथित बोगस मतदान कारणीभूत असल्याचा त्यांचा आरोप आहे. कराड उत्तर, कराड दक्षिण आणि मलकापूर परिसरातील मतदार यादीत एका व्यक्तीची दोन ठिकाणी नावे असल्याचा दावा त्यांनी केला.
त्यांच्या म्हणण्यानुसार, काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीनंतरही या मुद्यावर प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. आता जिल्हाधिकारी कार्यालय आणि प्रांत कार्यालयाकडेही संबंधित यादी आणि पुरावे सादर करण्यात आले आहेत. या प्रक्रियेमुळे सुमारे ४० ते ४५ हजार दुबार नावे कमी होऊ शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
वारंजी गावाचे उदाहरण देत त्यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीत सुमारे ३,६०० मतदार असताना विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदारसंख्या अचानक ४,२०० पर्यंत वाढल्याचा दावा त्यांनी केला. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून मतदार यादी शुद्ध करण्याची मागणी काँग्रेसने प्रशासनाकडे केली आहे.