
मायणी येथील शिंदेवाडी ग्रामस्थांनी शक्तिपीठ महामार्गाची रोखली मोजणी
मायणी / मारुती पवार : नागपूर-गोवा या शक्तिपीठ महामार्गाच्या अधिग्रहण करावयाच्या जागेची मोजणी करणे व येथील जमीन मालकांशी समन्वय साधने यासाठी शासकीय अधिकारी खटाव तालुक्यातील शिंदेवाडी येथील आले होते. मात्र, जागेची मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी सदर वेळी तीव्र विरोध दर्शविल्याने विना मोजणी करता परत जावे लागले.
सदर मार्ग माण व खटाव तालुक्यातून जात आहे. खटाव तालुक्यातील मायणी शेजारील शिंदेवाडी येथे मार्गाची मोजणी करणे व येथील जमीन मालकांशी समन्वय साधने यासाठी शासकीय अधिकारी आले होते. अधिकारी आल्याचे समजताच शिंदेवाडीमधील सर्व ग्रामस्थ एकत्र आले व त्यांनी आम्हाला रस्ता नको, मोजणी करू नका, असा संताप अधिकाऱ्यांपुढे व्यक्त करून मोजणीस प्रतिबंध केला.
सदर वेळी खटावच्या तहसीलदार बाई माने, भूमापन उपअधीक्षक भूमिलेख खटावचे अधिकारी सुनील राऊत, रस्त्याचे काम करणाऱ्या मोनोज कंपनीचे प्रतिनिधी प्रमोद सावंत, मायणीचे सरपंच प्रतिनिधी रणजीत माने, तलाठी ढोले, मायणीचे पोलीस पाटील प्रशांत कोळी, पोलीस विभागाचे कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. त्यावेळी ग्रामस्थांनी पुढीलप्रमाणे या रस्त्यासंदर्भात तक्रारी केल्या. आम्हास हा रस्ताच नको, पिढ्यान पिढ्या शेतीवर जीवन चरितार्थ चालवणाऱ्या आम्हा लोकांना सदर जमीन गेल्यामुळे भूमीहीन व्हावे लागेल, जमिनी गेल्यामुळे आमच्या पुढच्या पिढ्या जगणार कशा, त्याचप्रमाणे या शक्तीपीठ महामार्गाचा जुना मार्ग होता.
त्या सर्वेनुसारच रस्त्याचे काम करावे. तसेच शेतकऱ्यांची कोणतीही चर्चा न करता त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांच्या सातबारावर सदर जागेचा बोजा चढवण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना बँका कर्ज देण्यास नकार देत आहेत. त्याचप्रमाणे सदर मोजणीची नोटीस ही 12 ऑगस्ट रोजी आली असताना कोणत्याही शेतकऱ्यास सदर नोटीस दिली गेली नाही, त्याचप्रमाणे दिलेल्या नोटिसीवर कोणत्याही जबाबदार अधिकाऱ्याची सही नाही.
दिल्या जाणाऱ्या जमिनीच्या मोबदल्यात आम्हास मिळणारी रक्कम ही किती दिवस पुरणार आहे. आमच्या पुढच्या पिढीने काय करावयाचे, शेतीशिवाय आम्हास अन्य कोणताही उद्योगधंदा नाही. त्यामुळे आमच्या जमिनीचे अधिग्रहण करू नये, अशा तीव्र प्रतिक्रिया ग्रामस्थांनी यावेळी तहसीलदार यांच्यापुढे मांडल्या.
या संदर्भात बोलताना तहसीलदार म्हणाल्या, सदर रस्त्याचे कामी माण तालुक्यातील चौदा गावातील लोकांनी तसेच, खटाव तालुक्यामधील पाचपैकी चार गावातील लोकांनी सहकार्याची भूमिका घेतली असून, आपणही या कामी सहकार्य द्यावे. आपल्या ज्या काही अडचणी असतील त्या आपण आपल्या निवेदनाद्वारे आमच्याकडे दिल्यास त्या अडचणी आम्ही शासनापुढे मांडू मात्र या कामास आपण विरोध करू नये.