Complaint against Prashant Arbale
प्रभारी गटशिक्षणाधिकारी आरबाळे शिक्षकांना विनाकारण त्रास देत असून, त्यांच्या मनमानी कारभारामुळे अक्कलकोटच्या शिक्षण क्षेत्रात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. आरबाळे यांच्याविरोधातील फाईल दोन वर्षांपासून प्रलंबित असून, त्यांच्यावर वरिष्ठांचा वरदहस्त असल्यामुळे त्यांचे धाडस वाढत आहे. त्यांची वर्तणूक अक्कलकोटच्या शिक्षण क्षेत्रासाठी ही धोक्याची घंटा ठरत आहे. शाळांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही कट्टीमनी यांनी उपस्थित केला. आरबाळे यांच्या कार्यकाळात बबलाद शाळेची दुर्घटना घडून विद्यार्थी व शिक्षक जखमी झाले आहेत. अनेक शाळांच्या इमारती आजही धोकादायक स्थितीत असल्याच्या तक्रारी शिक्षकांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे केल्या आहेत. मात्र, त्यावर अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने भविष्यात विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याऐवजी दुर्घटनांना सामोरे जावे लागू शकते, असा इशाराही त्यांनी दिला.
आरबाळे यांच्या विरोधातील तक्रार ऐकून घेत असतानाच प्राथमिक शिक्षणाधिकारी विशाल मुळे यांनी मुख्याध्यापक महांतेश्वर कट्टीमनी यांच्या शैक्षणिक कार्याची माहितीही जाणून घेतली. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद कन्नड शाळेतील मुलींना स्वतःचा आणि शिक्षिका पत्नीचा पीएफ काढून विमान प्रवास घडवून आणणे, स्वच्छ व सुंदर शाळा उपक्रम, प्रज्ञाशोध व शिष्यवृत्ती परीक्षांसह विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना यश मिळवून देणे, असे विविध उपक्रम कट्टीमनी यांनी राबविल्याचे समोर आले. नागणसूर व मैंदर्गी येथील शाळांमध्ये स्वखर्चाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवून देणे, बोअर घेऊन शाळेच्या परिसरात बाग फुलविणे, मोफत शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे, विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक मदत करणे, अशा विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांची माहितीही त्यांनी दिली.
प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांविरोधात तक्रार करण्यासाठी आलेल्या मुख्याध्यापक कट्टीमनी यांच्या शैक्षणिक कार्याची माहिती ऐकून शिक्षणाधिकारी विशाल मुळे यांनी समाधान व्यक्त केले. त्यांच्या कार्याचे कौतुक करत शिक्षण क्षेत्रात अशा उपक्रमांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. मुख्याध्यापक महांतेश्वर कट्टीमनी यांनी मांडलेल्या तक्रारी शिक्षणाधिकारी विशाल मुळे यांनी सविस्तर ऐकून घेतल्या. आरबाळे यांच्या कारभाराबाबत तसेच शाळांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नाबाबत तत्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. आरबाळे यांच्या विरोधात यापूर्वी शिक्षकांनी आंदोलन करून प्रशासन व पदाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्याची आठवणही कट्टीमनी यांनी करून दिली.






