
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Solapur News: ग्रामीण घरकुल योजनेंतर्गत पहिला हप्ता म्हणून १५ हजार रुपयांचे अनुदान खात्यावर जमा होऊन १५ महिन्यांहून अधिक कालावधी उलटला, तरीही अनेक लाभार्थ्यांनी घरकुलाच्या बांधकामाला सुरुवात केलेली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या लाभार्थ्यांकडून तातडीने बांधकाम सुरू करून घेण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून १५ ते ३१ ऑगस्टदरम्यान विशेष पंधरवडा राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेदरम्यान ग्रामपंचायत स्तरावर लाभार्थ्यांच्या विशेष बैठका घेण्यात येणार आहेत. पहिला हप्ता खात्यावर जमा होऊन १५ महिन्यांहून अधिक काळ झाला असल्याची माहिती देत पुढील आठ दिवसांत घरकुलाचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू करण्याच्या सूचना लाभार्थ्यांना दिल्या जाणार आहेत.
लाभार्थ्यांना घरकुलासाठी मिळणाऱ्या विविध हप्त्यांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच व्हीबी-जी राम जी अंतर्गत उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधींबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे.
बैठकीनंतर लाभार्थ्यांच्या दोन स्वतंत्र याद्या तयार केल्या जाणार आहेत. आठ दिवसांत बांधकाम सुरू करण्यास तयार असलेले लाभार्थी आणि वारंवार सूचना देऊनही बांधकाम सुरू करण्यास इच्छुक नसलेले लाभार्थी, अशा दोन याद्या पंचायत समिती आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे सादर कराव्या लागणार आहेत.
विशेष पंधरवड्यात सुरू होणारी घरकुले दिवाळीपूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी तालुकास्तरावरील खातेप्रमुख, विस्तार अधिकारी आणि शाखा अभियंता यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
प्रत्येक घरकुलाच्या कामाचे टप्पानिहाय नियोजन करून मायक्रो-प्लॅनिंग करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
घराचे स्वप्न पूर्ण होणार! ‘या’ तारखेला तब्बल ११,१२० घरांसाठी जाहिरात; म्हाडा लॉटरीप्रमाणे निवड
गटविकास अधिकाऱ्यांवर जबाबदारी
विशेष पंधरवडा प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व गटविकास अधिकाऱ्यांनी वैयक्तिक लक्ष देऊन कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिले आहेत.
पहिला हप्ता मिळूनही बांधकाम सुरू करण्यास इच्छुक नसलेल्या लाभार्थ्यांना प्रशासनाकडून अंतिम सूचना देण्यात येणार आहेत. वारंवार सूचना देऊनही बांधकाम सुरू न केल्यास घरकुलाची मंजुरी रद्द करण्यासह आतापर्यंत दिलेले शासकीय अनुदान वसूल केले जाऊ शकते, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी मिळालेल्या निधीचा योग्य वापर करून घरकुलाचे बांधकाम तातडीने सुरू करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
स्वातंत्र्यदिनी सामूहिक भूमिपूजन
१५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून बांधकामास तयार असलेल्या लाभार्थ्यांच्या घरकुलांचे गावपातळीवर सामूहिक भूमिपूजन करण्यात येणार आहे. यासाठी सरपंच, उपसरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य तसेच लोकप्रतिनिधींना आमंत्रित करण्यात येणार आहे.
विशेष पंधरवडा : १५ ते ३१ ऑगस्ट
पहिला हप्ता : १५ हजार रुपये
बांधकाम सुरू करण्यासाठी मुदत : ८ दिवस
लक्ष्य : दिवाळीपूर्वी घरकुले पूर्ण करणे