
खासदार सुप्रियाताई सुळे
‘महिला या देशाची सर्वात मोठी ताकद’; राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’मध्ये तरुणाईशी संवाद
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ हे समूह विद्यापीठ असून, भारत सरकारच्या राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत महाराष्ट्र शासनाने दिनांक २७ ऑक्टोबर २०२१ रोजी राज्य सार्वजनिक विद्यापीठ म्हणून या विद्यापीठाची स्थापना केली आहे. विद्यापीठाचे प्रथम कुलाधिकारी म्हणून रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री. चंद्रकांत दळवी यांनी जबाबदारी सांभाळली आहे. त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर आता खासदार सुप्रिया सुळे यांची नूतन कुलाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ हे एक नॉन-अफिलिएटिंग विद्यापीठ असून यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा, छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा आणि धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, सातारा ही विद्यापीठाची घटक महाविद्यालये आहेत. अल्पावधीतच कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाने उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात आपला स्वतंत्र नावलौकिक निर्माण केला आहे. आधुनिक शिक्षणपद्धती, कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम, संशोधन आणि विद्यार्थीकेंद्रीत उपक्रमांच्या माध्यमातून विद्यापीठ सातत्याने प्रगती करत आहे. विद्यापीठामध्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांतील ८२ पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू असून सुमारे ८,००० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच २१ विषयातील पीएच.डी अभ्यासक्रम सुरु असून संशोधन क्षेत्रात विद्यापीठाचे उत्तम कामकाज सुरु असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांनी दिली.
विद्यापीठाचे कुलगुरू, कुलसचिव, सांविधिक अधिकारी व अधिष्ठाता यांच्या उपस्थितीत विद्यापीठाचे श्री. चंद्रकांत दळवी यांनी आपल्या पदाचा कार्यभार नूतन कुलाधिकारी श्रीमती सुप्रियाताई सुळे यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी त्यांनी विद्यापीठाच्या प्रशासकीय, शैक्षणिक व विविध विभागांच्या कामकाजाची तसेच विद्यापीठामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती नूतन कुलाधिकारी श्रीमती सुप्रियाताई सुळे यांना दिली. रयत शिक्षण संस्थेचे स्वतंत्र विद्यापीठ असावे, ही कर्मवीर भाऊराव पाटील यांची मनोमन इच्छा होती. त्यांच्या या स्वप्नाच्या अनुषंगाने विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जात असून, विद्यापीठ उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करीत आहे,” असे मत रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री. चंद्रकांत दळवी यांनी व्यक्त केले.
रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲड. भगीरथ शिंदे यांनी नूतन कुलाधिकारी खासदार सुप्रिया सुळे यांचे मनःपूर्वक स्वागत करून त्यांचे अभिनंदन केले. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासासाठी, शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी तसेच विद्यार्थ्यांच्या हितासाठी नूतन कुलाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाला निश्चितच नवी दिशा व गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विद्यापीठाच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना नूतन कुलाधिकारी खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कुलाधिकारीपदी नियुक्ती होणे ही माझ्यासाठी अत्यंत सन्मानाची बाब आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्य, ग्रामीण आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याचे जे स्वप्न पाहिले, त्या स्वप्नाची पूर्तता करणारे हे विद्यापीठ आहे. त्यामुळे ‘कर्मवीरांच्या स्वप्नातील विद्यापीठ’ अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि समाजाभिमुख करण्याची जबाबदारी माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या विद्यापीठाच्या उभारणीसाठी तसेच भविष्यातील सर्वांगीण प्रगतीसाठी योगदान देताना मला मनस्वी आनंद होईल. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक ज्ञान, कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम आणि संशोधनाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने काम करण्याचा माझा प्रयत्न राहील.”
या प्रसंगी रयत शिक्षण संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, माध्यमिक शिक्षण विभागाचे सहसचिव श्री. बंडू पवार, विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता प्रा. डॉ. अनिलकुमार वावरे, प्रा. डॉ. डी. डी. नामदास, प्रा. डॉ. आर. आर. साळुंखे, विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. डॉ. विजय कुंभार, परीक्षा विभागाचे संचालक डॉ. हेमंत उमाप, वित्त व लेखाधिकारी डॉ. धनाजी जाधव, तसेच घटक महाविद्यालयांचे प्राचार्य डॉ. साळुंखे, प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे, उपकुलसचिव सौ. बिना निपाने, श्री. निर्मल पवार, श्री. जगन्नाथ काटकर आदी उपस्थित होते.