
जंतरमंतर प्रकरणी टेंभुर्णीत भव्य निषेध मोर्चा; वंचित बहुजन आघाडी व वडार परिवर्तन सेनेची केंद्र सरकारवर टीका
टेंभुर्णी | प्रतिनिधी : दिल्लीतील जंतरमंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थी व आंदोलनकर्त्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ गुरुवारी (दि. २३) टेंभुर्णी येथे विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, व्यापारी, वकील, डॉक्टर आणि शेकडो युवकांच्या सहभागाने भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला प्रतिसाद देत शहरात आंदोलन करण्यात आले. अत्यावश्यक सेवा वगळता व्यापाऱ्यांनी बंदला शंभर टक्के प्रतिसाद देत टेंभुर्णी शहर कडकडीत बंद ठेवले.
मोर्चाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. आंदोलनादरम्यान केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
Wardha : भरपावसात गांधीगिरी ! पेपरफुटीवर काँग्रेसची आक्रमक भूमिका…
यावेळी वडार परिवर्तन सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार धोत्रे यांनी विद्यार्थ्यांच्या लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनावर झालेला कथित लाठीहल्ला हा लोकशाहीची गळचेपी करणारा प्रकार असल्याचा आरोप केला. केंद्र सरकार विद्यार्थ्यांवर अन्याय करत असून अशा प्रवृत्तीचा देशभर निषेध व्हावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. नीट पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान तसेच आंदोलनकर्त्यांवरील कारवाईची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
कुर्डूवाडी चौक येथे आयोजित सभेनंतर मंडल अधिकारी शेळवणे यांना निवेदन देण्यात आले. दिल्लीतील आंदोलनकर्त्यांवरील कथित लाठीहल्ल्याचा निषेध नोंदवून भविष्यातही लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
आंदोलनात माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी पाटील चांदजकर, प्रमोद कुटे, बाळासाहेब पाटील, मधुकर देशमुख, सचिन जगताप, महेंद्र सोनवणे, डॉ. राहुल पाटील, विशाल नवगिरे, औदुंबर (भाऊ) देशमुख, ॲड. तुकाराम राऊत, डॉ. ज्योती अनंत कवळस, महेंद्र वाक्षे, क्रांती लोंढे, सुनील ओव्हाळ, वैभव कुटे, डॉ. पांडुरंग गायकवाड, भीमराव बंडगर, सुरेश लोंढे, गोविंद भाऊ पवार, नारायण गायकवाड, हरीभाऊ माने, बाबा चंदनकर, संतोष खैरमोडे, प्रशांत सोनवणे, गणेश केचे, सुनील ओहोळ, विकास बंदपट्टे, सुनील पवार, दादा पवार, समाधान पवार, रमेश पवार, अक्षय काळे, सचिन पवार, महादेव धोत्रे, महेश पवार, राहुल धोत्रे, सुरज धोत्रे, समाधान जाधव, राहुल कांबळे, सागर पवार यांच्यासह वंचित बहुजन आघाडी, वडार परिवर्तन सेना, व्यापारी, वकील, डॉक्टर, विद्यार्थी, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते महावीर वजाळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन राजकुमार धोत्रे यांनी मानले.