ठाणे / स्नेहा जाधव,काकडे : अनधिकृत बांधकामांना चाप लावण्यासाठी, दिवा आणि मुंब्रा या भागावर देखरेख करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांचे विशेष पथक निर्माण करण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.दिवा आणि मुंब्रा भागात अनधिकृत बांधकामांच्या अधिक तक्रारी आहेत. त्याची शहानिशा करण्यासाठी तसेच देखरेख करण्यासाठी या विशेष पथकाची निर्मिती केली जाणार असल्याचे, आयुक्त राव यांनी स्पष्ट केले आहे.
अनधिकृत असलेली घरं किवा इमारतींवर गणेशोत्सव काळात कोणतीही कारवाई केली जाणार नाही. महापालिका क्षेत्रातील या कारवाईचा आढावा महापालिका आयुक्त राव यांनी शनिवारी झालेल्या विभागप्रमुखांच्या बैठकीत घेतला.
या बैठकीस, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, परिवहनचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी, नगररचना सहाय्यक संचालक संग्राम कानडे यांच्यासह विभागप्रमुख, सर्व उपनगर अभियंता, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता उपस्थित होते. उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे यांनी बैठकीत कर्मयोगी पोर्टल, १५० दिवसांचा कार्यक्रम आदी विषयांबाबत सादरीकरण केले. उपायुक्त शंकर पाटोळे यांनी अनधिकृत बांधकामांवरील कारवाईची माहिती दिली. तर, मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी गणेश मूर्ती कार्यशाळा आणि विसर्जन व्यवस्था याची माहिती दिली.
उच्च न्यायालयाने अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सर्व प्रभाग समिती क्षेत्रात कारवाई सुरू आहे. आतापर्यंत २२७ बांधकामांवर कारवाई झाली असून २४ गुन्हे दाखल झाले आहेत. या कामात अडथळा आणणाऱ्यांवर शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करावा, असे निर्देशही आयुक्त राव यांनी दिले.
या बैठकीत, गणेशोत्सव आयोजन आणि विसर्जन व्यवस्था यांचाही आयुक्त राव यांनी आढावा घेतला. यावर्षी, मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, सहा फुटांपर्यंतच्या सर्व मूर्ती कृत्रिम तलावातच विसर्जित केल्या जाणार आहेत. त्यामुळे कृत्रिम तलावांची संख्या वाढवण्यात आली आहे. तसेच, फिरती विसर्जन पथके अधिक करून मोठमोठ्या गृहसंकुलात विसर्जनाची फिरती पथके जातील याची व्यवस्था केली असल्याने त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त राव यांनी केले.
पावसाळ्यातील आताचा काळ धोकादायक इमारतींसाठी कसोटीचा असतो. त्यामुळे अजूनही ज्या अतिधोकादायक इमारतींमध्ये नागरिक राहत आहेत त्या इमारती तातडीने रिक्त करून त्या सील कराव्यात. त्याचा ताबा पुन्हा रहिवाशांनाच दिला जाईल, असा विश्वास त्या नागरिकांना द्यावा, असे आयुक्त राव यांनी पुन्हा स्पष्ट केले.