
१५ सायकलस्वारांचा कल्याण ते उटी सायकल प्रवास, एका आठवड्यात कापणार १२०० किमीचे अंतर
कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी चौकातून हे 15 सायकलस्वार उटीच्या दिशेने रवाना झाले. कल्याणातील बाईकपोर्ट या सायकलिस्ट संस्थेच्या माध्यमातून गेल्या 7 वर्षांपासून हे कल्याणातील सायकलस्वार सामाजिक संदेश घेऊन देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहेत. ज्यामध्ये गोवा, दिल्ली, हैद्राबादसह गेल्यावर्षी महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या प्रदेशाचा समावेश आहे. यंदाची ही सायकलस्वारी कल्याण, पुणे, पंढरपूर, विजयपूरा, चित्रदुर्ग, म्हैसूर, मदुमलई जंगलामार्गे गुडलूर आणि मग उटी अशी 1 हजार 200 किलोमीटरची असणार आहे. ज्यामध्ये चंद्रभान साबळे, आनंद जाधव, हितेन राणे, मनोज चौगुले, राकेश कुमार, पवन, दर्शन वाकचौरे, मिलिंद देशमुख, अलतमाश शेख, अमित मोरे, साहिर शेख, डॉ. रेहनुमा, सारंग दळवी, गिरीश राव, संदीप अत्रे, रमेश पालटी, अनुप रॉय, पुरुषोत्तम करंबेळकर हे सायकलिस्ट सहभागी झाले आहेत.
तर यापूर्वी झालेल्या सायकल रॅलीमध्ये दिल्लीनतरचा हा दुसरा सर्वात लांबचा टप्पा असून चढाईच्या दृष्टीने सर्वात आव्हानात्मक प्रवास असणार आहे. कारण जवळपास समुद्रसपाटीपासून दहा हजार फूट म्हणजेच एव्हरेस्टपेक्षा अधिक उंचीवरील ही सायकल रॅली असल्याची माहिती या बाईकपोर्ट सायकलिंग क्लबचे प्रमुख डॉ. रेहनुमा यांनी दिली.
सायकलिस्टबद्दलचा आदर आणि त्यांची रस्त्यावरील सुरक्षितता हा संदेश घेऊन आम्ही यंदाची सायकल रॅली आयोजित केली आहे. सायकलिंगचे आरोग्यासोबतच पर्यावरणाचे महत्त्वही सर्वांना माहिती असून त्याला हातभार लावणाऱ्या सायकलिस्टबद्दल लोकांनी आदर बाळगणे आवश्यक आहे. तसेच सायकलिस्टनेदेखील आपल्या सुरक्षेचा विचार करूनच शहरात सायकल चालवावी हा सामाजिक संदेश घेऊन आम्ही जाणार असल्याचे या उपक्रमातील सदस्य प्रतिक गरवारे यांनी सांगितले.