
डोंबिवलीकरांची वाहतूक कोंडीतून सुटका कधी? जोशी स्कूल पुलाचा रखडलेला ‘आर्म’ महासभेत गाजला
20 ऑगस्ट रोजी झालेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महासभेत नगरसेवक दीपेश पुंडलिक म्हात्रे आणि नगरसेविका खुशबू चौधरी यांनी या प्रलंबित कामाचा मुद्दा उपस्थित केला. डोंबिवली पूर्व-पश्चिम भागाला जोडणारा हा पूल वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. मात्र 90 फूट रस्त्याकडे जाणारा आर्म पूर्ण झालेला नसल्याने वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत असून वाहतूक कोंडी आणि प्रवासातील अडचणी कायम असल्याचे त्यांनी महासभेत निदर्शनास आणून दिले.
पुलाचा 90 फूट रस्त्याकडे उतरणारा आर्म पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया आणि त्यासंदर्भातील प्रलंबित बाबींमुळे काम रखडले आहे. अनेक वर्षे उलटूनही हा प्रश्न मार्गी न लागल्याने नागरिकांमध्येही नाराजी आहे. जमीन अधिग्रहणातील सर्व अडथळे तातडीने दूर करून पुलाचे उर्वरित काम लवकर पूर्ण करावे, अशी आग्रही मागणी दीपेश म्हात्रे आणि खुशबू चौधरी यांनी केली.
महासभेत करण्यात आलेल्या मागणीची दखल घेत महापौर आणि महापालिका आयुक्तांनी संबंधित विभागांची तातडीने बैठक घेण्याचे निर्देश दिले. जमीन अधिग्रहणासह पुलाच्या कामात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करून रखडलेले काम लवकर मार्गी लावण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले.
जोशी स्कूलजवळील पुलाचा 90 फूट रस्त्याकडे उतरणारा आर्म पूर्ण झाल्यानंतर डोंबिवली पूर्व-पश्चिम दरम्यानची वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. वाहनांना पर्यायी जोडमार्ग उपलब्ध झाल्यामुळे सध्याच्या मार्गांवरील वाहतुकीचा ताणही कमी होण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर नागरिकांचा प्रवासाचा वेळ कमी करणे आणि परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरू शकतो.
अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाबाबत प्रशासनाने आता गांभीर्याने निर्णय घ्यावा, जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण करावी आणि नागरिकांना पुलाचा पूर्ण लाभ मिळवून द्यावा, अशी अपेक्षा नगरसेवक दीपेश पुंडलिक म्हात्रे आणि नगरसेविका खुशबू चौधरी यांनी व्यक्त केली आहे.